विहिरीत करंट उतरून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू.

 

धर्माबाद प्रतिनिधी :- धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी शिवारात विहिरीत उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

मृतांमध्ये कृष्णा नागनाथ माडगीनवाड (२५, रा. शंकरगंज) आणि अविनाश भोजन्ना तोंडाकुरवाड (२०, रा. रत्नाळी) यांचा समावेश आहे. दोघेही शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले असता विहिरीत अचानक विद्युत करंट उतरल्याने पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनी दोघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

 

 

 

यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन विहिरीवरील विद्युत जोडणी काढून पुढील अनर्थ टाळला. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

 

 

या घटनेनंतर शेत परिसरातील उघड्या व धोकादायक विद्युत जोडण्यांबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.