सत्यपाल महाराज : प्रबोधनाचा अखंड दीपस्तंभ वाढदिवस विशेष.
आई सुशीलाबाईंच्या ओठांवर नेहमीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांच्या ओळी असायच्या. त्यांचे लेकरू त्या ओळी मोठ्या कौतुकाने ऐकायचे, कधी मायसोबत गुणगुणायचे. गुरुकुंज मोझरी येथील ज्ञान, संस्कार आणि अध्यात्मिक वातावरणाने त्या बालमनाला खोलवर प्रभावित केले. खंजेरी हातात घेऊन भजन गाण्याची त्याला तीव्र ओढ होती; पण गरिबी इतकी होती की खऱ्या खंजेरीचे स्वप्नही दूर होते. मग फुटक्या मडक्याच्या रिंगेला प्लास्टिकची पन्नी बांधून त्याने स्वतःची खंजेरी तयार केली आणि त्यावर थाप देत “गुरुदेव हमारा प्यारा, है जीवन का उजियारा” हे भजन ओठांवर आणले.
राष्ट्रसंतांच्या “जीवन का उजियारा” या शब्दांनी जणू त्याच्या आयुष्यालाच दिशा दिली. त्या प्रकाशकिरणांचा वारसा पुढे नेत हेच लेकरू गेली पाच दशकांहून अधिक काळ समाजाच्या जीवनात प्रबोधनाचा उजेड पसरवत आहे. हे नाव म्हणजे सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर. स्वतःला ‘महाराज’ म्हणवून घेणे त्यांना पसंत नसले तरी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना आदराने सत्यपाल महाराज म्हणूनच ओळखतो.
‘माय’ने दिलेले नाव – सत्यपाल
अकोला जिल्ह्यातील शिरसोली या मातीत सुशीलाबाई आणि विश्वनाथ यांच्या पोटी सत्यपाल महाराजांचा जन्म झाला. आईला ते प्रेमाने ‘माय’ म्हणतात. लेकराचे नाव ठेवताना ज्योतिषाचा आधार न घेता मायने एकच विचार केला—माझा मुलगा सत्याच्या मार्गाने चालावा, सत्याचे पालन करावे. म्हणून नाव ठेवले सत्यपाल. आणि त्यांनी ते नाव आयुष्यभर सार्थ ठरवले.
गरिबीतून घडलेला सत्याग्रही
लहानपण अत्यंत हलाखीत गेले. अंगावर पुरेसे कपडे नव्हते, अनेकदा भजन म्हणण्याची संधीही मिळत नव्हती. पण चिकाटी आणि जिद्द कधी सुटली नाही. ते भजन ऐकत राहिले, निरीक्षण करत राहिले आणि नकळत स्वतःच भजन-प्रबोधनाच्या मार्गावर तयार होत गेले.
सप्तखंजेरीची अद्भुत किमया
प्रयोगशील वृत्ती आणि राष्ट्रसंतांची प्रेरणा यामुळे त्यांनी खंजेरीवादनात अनोखा प्रयोग केला. एक नव्हे, दोन नव्हे तर एकाच वेळी सात खंजेरी वाजवण्याचा अद्भुत पराक्रम त्यांनी साकारला. अशा प्रकारे जगातील पहिले सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
त्यांच्या या कलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर पोहोच घेतली. त्यांच्या प्रेरणेने संदीपपाल, रामपाल, पवनपाल, उदयपाल, आनंदपाल, पंकजपाल, संघपाल, कमलपाल, हृषिपाल, तुषार सूर्यवंशी, आकाश टाले, पवन दवंडे यांसारख्या अनेक युवकांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला.
पुरस्कारांची रक्कम समाजकार्यासाठी
सत्यपाल महाराजांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे; मात्र या पुरस्कारांच्या रकमा त्यांनी कधी वैयक्तिक उपयोगासाठी वापरल्या नाहीत. सुसंस्कार शिबिरे, नेत्रतपासणी शिबिरे, स्मशानभूमी स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम अशा विविध समाजोपयोगी कार्यांसाठी त्या रकमा खर्च केल्या.
महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, संत चोखामेळा पुरस्कार, शाहू महाराज स्मृतिचिन्ह, विदर्भ गौरव, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव अशा असंख्य सन्मानांनी त्यांचे कार्य गौरवले गेले आहे.
मान-अपमानाच्या पलीकडचा प्रवास
सायकलवरून सुरू झालेली त्यांची प्रबोधनयात्रा आज लाखो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करूनही अखंड सुरू आहे. अनेकदा विरोध, रोष, अपमान सहन करत त्यांनी समाजातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनतेवर कठोर शब्दांत प्रहार केला.
जिथे जिथे ते जातात तिथे कर्तृत्ववान महिलांचा, वीरपत्नींचा सन्मान करतात, विद्यार्थ्यांना पुस्तके देतात, युवकांशी संवाद साधतात आणि राष्ट्रसंतांच्या विचारांची गोडी लावतात.
साहित्य, विचार आणि प्रबोधन
त्यांचे ‘सत्यानाश’ हे पुस्तक विशेष गाजले. ‘सत्यपालची सत्यवाणी’ हा कार्यक्रम जगभरात लोकप्रिय झाला. कोणत्याही जाहिरातीशिवाय हजारो लोक त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यांच्या कार्यावर रामपाल धारकर यांनी ‘प्रबोधनसम्राट’ हे पुस्तक लिहून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
कुटुंब, मानवता आणि देहदानाचा संकल्प
सत्यपाल महाराजांचे २७ जणांचे एकत्र कुटुंब आहे. वडिलांचे नेत्रदान, पत्नी सुनंदा यांचे देहदान आणि स्वतःच्या देहदानाचा संकल्प—ही त्यांची मानवतेची खरी शिकवण आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. धर्मपाल हेही समाजसेवेत सक्रिय असून गरजूंना आरोग्यसेवा देतात.
प्रबोधनाचा अखंड दीप
महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या क्रांतीविचारांचे बीज समाजमनात पेरण्याचे महान कार्य सत्यपाल महाराज करत आहेत.
१६ मे हा त्यांचा जन्मदिन. वयाची साठी ओलांडूनही त्यांची ऊर्जा, जिद्द आणि समाजप्रबोधनाची तळमळ तरुणांना प्रेरणा देते. प्रबोधन, मानवता आणि सत्याचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या आदरणीय सत्यपाल महाराजांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— सुनील इंदुवामन ठाकरे
वणी, जि. यवतमाळ.
