मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अनुभव लेखन उपक्रमाचे आयोजन

मुंबई, दि. ०३ :- समता हे आपल्या संविधानातील एक महत्त्वाचे मूल्य आहे. या दृष्टीने यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अनुभव लेखन हा उपक्रम आयोजित केला असून, त्याचा विषय ‘कशासाठी?- लिंगभाव समतेसाठी’ आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

स्त्री जन्माला येत नाही, तर ती घडवली जाते. या सीमॉन द बोव्हारच्या वाक्यातील मर्म आपण सारे जाणतो; आणि म्हणून पुरुषही जन्माला येत नाही, तर तोही घडवला जातो, याची जाणीवही सीमॉनचे हे वाक्य आपल्याला करून देते. स्त्रियांनी आणि पुरुषांनी कसे वागावे, याविषयी आपल्या पुरुषप्रधान समाजाच्या पारंपरिक चौकटी ठरलेल्या आहेत आणि त्यानुसार सर्वांना लहानपणापासून वाढवले जाते. या चौकटी जाचक ठरायला लागल्यावर काही व्यक्तींनी त्या नाकारायला सुरुवात करून सांविधानिक समतेची कास धरलेली दिसते. या उपक्रमासाठी स्त्री-पुरुष, तृतीयपंथी यांनी आपल्या जगण्यात लिंगभाव समता आणण्यासाठी केलेले प्रयत्न, संघर्ष, अनुभव लिहून ते २५ मार्चपर्यंत पाठवायचे आहेत. आपले हे अनुभव इतरांनाही लिंगभाव समता आणण्यासाठी प्रेरणादायी ठरतील, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

अनेक समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे आज स्त्रिया मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ लागल्या असल्या, तरी आजही घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संख्या तुलनेत अल्प आहे. त्यासाठीही अनेकींना त्यांच्या-त्यांच्या पातळीवर लहान मोठे संघर्ष करावे लागत आहेत. हे संघर्ष कधी कौटुंबिक पातळीवरील असतात, तर कधी नोकरी-व्यवसायातील, प्रत्येकीने कधी ना कधी लिंगभाव असमानतेला तोंड दिलेले असते आणि सावकाश का होईना, काही प्रमाणात का असेना ती असमानता समानतेकडे झुकवण्यात ती यशस्वीही झालेली असते. असे संघर्ष कधी कौटुंबिक पातळीवर सातच्या आत घरात येण्याचे असतील किंवा घरकाम, शिक्षण, नोकरी, करिअर, लग्न, मुलाचे संगोपन इ. साठीचे असतील, तर कधी नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी मिळालेल्या भेदभावाचे असतील. पुरुषप्रधानता केवळ स्त्रियांच्या विकासालाच मारक आहे असे नव्हे, तर माणूस म्हणून जगण्यासाठी पुरुष आणि तृतीयपंथी यांचाही ही पुरुषप्रधानता तितकाच कोंडमारा करते, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

अनुभव लेखन उपक्रम सर्वांसाठी खुले असून संबंधितांनी आपले अनुभव मराठीत लिहावेत. लिखाणाची शब्दमर्यादा ७०० ते १२०० शब्द असावी तसेच लेखन हे अनुभवाधारित असावे, काल्पनिक नसावे. या उपक्रमांतर्गत आलेल्या निवडक लेखाचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुस्तक प्रकाशित करण्यात येईल. तसेच ‘पुन्हा स्त्री उवाच’ या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल. उपक्रमाची अधिक माहिती https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर) या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *