देगलूर प्रतिनिधी, दि.१५ :- प्राचीन काळापासूनच भाषेला अत्यंत महत्त्व असून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेसह वेगवेगळ्या भाषेचे अद्यावत ज्ञान आत्मसात करून शुद्ध भाषेचा प्रयोग केला पाहिजे त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन डॉ.काझी एम.के.यांनी केले.

ते देगलूर महाविद्यालय, देगलूर येथील हिंदी विभागाच्या वतीने राजभाषा हिंदी दिवसानिमित्त आयोजित हिंदी दिवस समारोह या कार्यक्रमात काल प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डाॅ.अनिल चिद्रावार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापकीय सदस्य डॉ.अशोक टिप्परसे, कार्यक्रमाचे संयोजक तथा हिंदी विभाग प्रमुख डॉ.संतोष येरावार, डॉ. खंदकुरे व्यंकट,पटेल एम.एम.,डॉ. शेख परवीन यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की हिंदी भाषा ही जगातील समृद्ध भाषा असून त्यास प्राचीन वारसा लाभलेला आहे. ती भारतीय संस्कृतीची वाहक असून राष्ट्रीय चेतना प्रवाहित करीत असते. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेसह वेगवेगळ्या भाषेचे शुद्ध ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे.

हिंदी भाषेत समृद्ध साहित्य परंपरा असून, राजभाषा, राष्ट्रभाषा व संपर्कभाषा असून त्यात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहे, असे ते म्हणाले प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. संयोजक डॉ.संतोष येरावार यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
यावेळी हिंदी अभ्यास मंडळाचे व भित्तिपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वयंलिखित काव्याचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. परवीन शेख यांनी केले तर आभार डॉ. खंदकुरे व्यंकट यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील वेगवेगळ्या विषयाच्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

