नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा

ठाणे, दि. १३ :-  नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध समस्यांचा आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना त्या दूर करण्याच्या सूचना आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्या.

 

नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांबाबत आज महापे येथील हॉटेल रामाडा इन येथे आयोजित बैठकीत श्री. सामंत बोलत होते. यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन शर्मा, वीज महामंडळाचे प्रादेशिक संचालक चंद्रकांत डागे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

कामे  वेळेवर पूर्ण  न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर पोलीसांच्या मदतीने कारवाई करावे. रस्ते तयार करताना विद्युत विभागाच्या वायर तुटतात. त्या वेळेवर दुरुस्त होत नाही. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात विद्युत खंडित होते. यापुढे नवीन कामे सुरू करताना सर्व विभागाची परवानगी घेऊन सुरु करावीत अश्या सूचना श्री. सामंत यांनी संबंधित विभागाना दिल्या.

औद्योगिक क्षेत्रात चोरीचे प्रमाण वाढल्याने नवी मुंबई महापालिकेने सीसीटीव्ही लावावे तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलीस गस्ती वाढविण्याच्या सूचना उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.

 

औद्योगिक क्षेत्रात पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढून समस्या दूर करण्यात येईल, असे यावेळी श्री. सामंत यांनी सांगितले.

 

यावेळी मंत्री श्री. सामंत यांनी उद्योजकांच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन  दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *