नवी मुंबई दि.०८:– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते (ऑनलाईन) तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-2’चे उदघाटन संपन्न झाले.
या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांनी जेएनपीए आणि पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी (पीएसए इंडिया) यांच्या सहकार्याचे कौतुक करून या भव्य टर्मिनलच्या निर्मितीसाठी अभिनंदन केले. नवीन टर्मिनल भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र असून वाढवण बंदर सुरू झाल्यानंतर जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये स्थान मिळेल. यामुळे भारत जागतिक समुद्री महासत्ता बनण्याच्या मार्गावर ठाम पाऊल टाकत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ऐतिहासिक यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पोर्ट लेड डेव्हलपमेंट’ या धोरणात्मक दूरदृष्टीला दिले. गेल्या दशकात बंदर क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व परिवर्तनामुळे भारत जागतिक समुद्री अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान भारत आणि सिंगापूर यांच्यात विविध सामंजस्य करारांचे आदानप्रदान झाले, ज्यामुळे भविष्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शांतनु ठाकूर, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार पराग शाह यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
