“विद्यार्थ्यांनो घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत” – प्रा. आर. बी. जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
देगलूर प्रतिनिधी दि.१४ :- प्रोफेशनल टीचर महाराष्ट्र राज्य असोसिएशन (PTA) जिल्हा नांदेड यांच्या वतीने आज पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सेवाभावी भूमिकेतून घेतलेल्या या उपक्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
उपक्रमामध्ये वझरगा, गळेगाव, आळंदी आणि टाकळी येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बापू सेवाभावी व बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी राज्याध्यक्ष तथा विद्यमान राज्य सल्लागार प्रा. आर. बी. जाधव सर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला साई शिक्षण संस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर, PTA जिल्हा नांदेडचे प्रा. राज अटकोरे, प्रा. संतोष गिरी, प्रा. गोपीनाथ होसेकर, प्रा. हिरास, प्रा. शुभम माळगे, देगलूर ब्रिलियंट कोचिंग क्लासेसचे दत्ता जाधव, महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री टिपराळे, तसेच शिक्षक भुसावळे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. आर. बी. जाधव म्हणाले:
“विद्यार्थ्यांनो, अभ्यास हा तुमच्या भवितव्याचा पाया आहे. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. आमच्या वतीने फुल नाही, पण फुलाची पाकळी जरी असली तरी विद्यार्थ्यांसाठी द्यायलाच हवी – ही आमची सामाजिक जबाबदारी आहे.”
तसेच त्यांनी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यातील त्यांची भूमिका यावरही प्रकाश टाकला.
कौतुकास्पद उपक्रम
आपल्या भाषणात बाळासाहेब पाटील खतगावकर म्हणाले:
“पूर आला, दु:ख आलं पण मदतीला कोणी आलं नाही. मात्र PTA ही पहिली संघटना आहे जी स्वतःच्या खर्चाने दुर्गम भागात जाऊन विद्यार्थ्यांच्या हातात साहित्य देते. हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे.”
प्रा. गिरी सर आणि प्रा. आटकरे सर यांनीही विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समितीचे प्रमुख, सोसायटी चेअरमन आणि शिक्षकवर्गाने मान्यवरांचा सत्कार करून उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात कृतज्ञता व्यक्त केली.
