नांदेड प्रतिनिधी दि.२२ :- महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राजपूत क्षत्रिय संघ आणि “राणा ग्रुप” यांच्या संयुक्त सहकार्याने रविवारी, दि. २१ डिसेंबर रोजी ओम गार्डन, कौठा (नांदेड) येथे राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात तब्बल ५०७ तरुण–तरुणींनी सहभाग नोंदवून सामाजिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला.
स्वर्गीय देविसिंह कुंवरसिंह चौहान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या संमेलनाचे उद्घाटन माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार बालाजीराव कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंडारकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी होते. प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
संयोजक अमरसिंह चौहान यांनी प्रास्ताविकात समाजातील तरुण पिढीसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे व विवाहविषयक संवाद सुलभ करणे हा संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी वधू–वर परिचय संमेलने ही केवळ विवाहापुरती मर्यादित नसून सामाजिक समन्वय व विश्वास वृद्धिंगत करणारी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी राजपूत समाजाची गौरवशाली परंपरा, शौर्य आणि देशसेवेतील योगदान अधोरेखित केले, तर आमदार आनंदराव बोंडारकर यांनी समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्ष दिलीपसिंह हजारी यांनी महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक उपक्रमांची माहिती दिली. सचिव मोहनसिंह तौर यांनी आभार प्रदर्शन केले.
परिचय सत्रात ५०७ युवक–युवतींनी व्यासपीठावर आपला परिचय दिला. धर्मभूषण ॲड. दिलीपसिंह ठाकूर यांच्या मुद्देसूद निवेदन व प्रसंगानुरूप विनोदाने कार्यक्रमाची रंगत वाढली. सहभागी प्रत्येकाला भेटवस्तू देण्यात आली, तर उत्कृष्ट परिचय सादर करणाऱ्या तीन युवक व तीन युवतींना आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात आली. परीक्षक म्हणून इंदिरा चौहाण व राम चव्हाण यांनी काम पाहिले.
उत्कृष्ट आयोजनाबद्दल अमरसिंह चौहान व आकर्षक संचालनाबद्दल दिलीप ठाकूर यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. “राणा ग्रुप” आणि “राणी पद्मिनी राजपूत महिला ग्रुप”च्या ड्रेस कोडने विशेष लक्ष वेधले. महाराणा प्रताप यांची छबी असलेली रांगोळी, राणी पद्मिनी ग्रुपकडून औक्षण, उत्तम ध्वनी–चित्रफित व्यवस्था, रुचकर भोजन आणि भरगच्च सभागृह यामुळे हे संमेलन संस्मरणीय ठरले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब कच्छवे, प्रकाशसिंह परदेशी, रवींद्रसिंह गौर, विठ्ठलसिंह गहेरवार, रतनसिंह चौहान, देवेंद्रसिंह चंदेल, संजयसिंह अवस्थी, रघुवीरसिंह हजारी, गंगासिंह ठाकूर, आनंदसिंह चंदेल, बाबूसिंह चौहान, विजयसिंह चौहान, किशनसिंह चंदेल, संजयसिंह ठाकूर, विजयसिंह ठाकूर, शैलेंद्रसिंह चौहान व अर्जुनसिंह ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
