प्रशासन गाढ झोपेत? वझरगा ग्रामस्थांना आजही स्मशानभूमी नाही!
(अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही; प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस)
देगलूर प्रतिनिधी, दि.२२:- देगलूर तालुक्यातील मो. वझरगा (ता. देगलूर, जि. नांदेड) या सुमारे १८०० ते २००० लोकसंख्येच्या गावात आजतागायत स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे, ही धक्कादायक आणि संतापजनक बाब समोर आली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक बालाजीराव सूर्यवंशी यांनी तहसीलदार, देगलूर यांना लेखी निवेदन सादर केले आहे. मात्र वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वझरगा गावात स्मशानभूमीच नसल्यामुळे मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार अडचणीच्या व अनधिकृत ठिकाणी करावे लागत आहेत. यामुळे सामाजिक तणाव, वादविवाद तसेच कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असून, पावसाळ्यात परिस्थिती अक्षरशः अमानवी होते, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
स्मशानभूमी ही ऐच्छिक सुविधा नसून मूलभूत गरज आहे, असे असताना देखील प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष म्हणजे ग्रामस्थांच्या भावना, परंपरा आणि माणुसकीकडे केलेली थेट दुर्लक्षपूर्ण वागणूक असल्याचा आरोप केला जात आहे.
निवेदनात माणिक सूर्यवंशी यांनी स्पष्ट शब्दांत तात्काळ स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे की —
👉 प्रशासन अजून किती मृत्यूंची वाट पाहणार?
👉 मृतांनाही सन्मानाने शेवटचा निरोप देण्याचा हक्क नाकारला जाणार का?
वझरगा ग्रामस्थांचा संयम संपत चालला असून, तात्काळ निर्णय न घेतल्यास उद्रेक अटळ असल्याचा इशारा देण्यात येत आहे.
