चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक; १५ लाखांचे बक्षीस.
देगलूर प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेमध्ये देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत १५ लाख रुपयांचे भव्य बक्षीस प्राप्त केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
ग्रामीण विकास, स्वच्छता, लोकसहभाग, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट प्रशासन आणि सर्वांगीण विकासकामांच्या जोरावर येरगी ग्रामपंचायतीने हा मानाचा बहुमान मिळविला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या स्पर्धेत येरगीने अव्वल स्थान मिळवत देगलूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या यशामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, विविध समित्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जात आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
प्रथम क्रमांकासह मिळालेल्या १५ लाख रुपयांच्या बक्षीस निधीमुळे गावातील विविध विकासकामांना अधिक गती मिळणार असून येरगी ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
या यशाबद्दल येरगी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच समस्त ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. चालुक्यकालीन ऐतिहासिक वारसा जपतानाच विकासाची नवी उंची गाठणाऱ्या येरगी गावाने जिल्ह्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
“एकच ध्यास – समृद्ध गाव, विकसित राज्य, समर्थ राष्ट्र” या संकल्पनेला साकार करणाऱ्या येरगी ग्रामपंचायतीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
