नांदेडमध्ये २७ वी भव्य चालण्याची स्पर्धा २४ जून रोजी; ११ गटांतील विजेत्यांना मोबाईल बक्षीस.
नांदेड, प्रतिनिधी : सुदृढ आणि निरोगी समाजाच्या निर्मितीचा संदेश देणारी २७ वी भव्य चालण्याची स्पर्धा बुधवार, दि. २४ जून रोजी सकाळी ६ वाजता श्रीराम सेतू, गोवर्धनघाट, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल आणि अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेच्या तयारीने अंतिम टप्पा गाठला असून, नांदेडकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेतील माध्यम प्रतिनिधींसह एकूण ११ गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना स्नेहलता जायस्वाल यांच्या सौजन्याने मोबाईल बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस आणि अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
स्पर्धेच्या दिवशी वेळेवर उपस्थित राहणाऱ्या पहिल्या २०० स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट भेट दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना विजयसिंह परदेशी यांच्या सौजन्याने आकर्षक स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, ॲड. चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंह गाडीवाले, सभागृह नेते ॲड. महेश कनकदंडे, विजय येवणकर, शीतल खांडील, विजय गंभीरे, सुषमा थोरात तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धकांना २ किलोमीटर अंतर चालायचे असून, पुरुष व महिला खुला गट, ४० ते ६० वर्षे वयोगट, ६० वर्षांवरील गट, अमरनाथ यात्रेकरूंसाठी स्वतंत्र गट तसेच माध्यम प्रतिनिधी गट अशा एकूण ११ गटांमध्ये स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांची स्वतंत्र टीम कार्यरत असून, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नोंदणी कक्ष, ध्वनी व्यवस्था, सुरक्षा आणि स्पर्धा मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी श्रीराम सेतू परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या आहेत.
अमरनाथ यात्रेच्या पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. गेल्या तीन महिन्यांपासून यात्रेकरूंना नियमित चालणे, व्यायाम, प्राणायाम आणि हास्ययोगाचे प्रशिक्षण दिले जात असून, या स्पर्धेद्वारे त्यांच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्यात येणार आहे.
स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली असून, आरोग्य संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नियमित चालणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याने प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले.
