नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबु लागवड व वृक्ष लागवड या घटकांकरिता अर्ज करण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत

 

लातूर प्रतिनिधी,दि.०८:- कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्हयातील हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे, शेतकऱ्यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील २८२ गावांमध्ये सन २०१८-१९ पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे. प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड या घटकाची सन २०२२-२३ मधील लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर, २०२२ अखेरपर्यंत राहील. तद्नंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

            सप्टेंबर, २०२२ अखेर पर्यंत एकुण प्राप्त्‍ अर्जांवर निकषानुसार पुर्वसंमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर, २०२२ अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे व सदर विषयी संबंधीत शेतक-याने हमीपत्र लिहुन देणे गरजेचे आहे.

 

 

             प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प्‍ गावातील इच्छुक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करुन दिलेल्या http://dbt.mahapocra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा आठ-अ, मोबाईल क्रमांक अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

            एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने लातूर यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *