पाऊलखुणा

 

 

इतिहासातील काही आख्यायिका असतात त्यात किती सत्य असतं ते देवच जाणो. अशीच काहीशी एक आख्यायिका आहे मराठ्यांचा प्रमुख सरदार ज्यांचे इतिहासात मोठे नाव आहे. ते धनाजी जाधव, संताजी व धनाजी या इतिहासातील जोडीतील एक नाव. हे निजामाला येऊन मिळाले निजामाकडे हैदराबादला येत असताना त्यांनी सातारा उदगीर बिदर जुक्कल बिचकुंदा, बांसवाडा गांधारी येल्लारेड्डी, कामारेड्डी, हैदराबाद या मार्गाचा वापर केला तेव्हा निजामाने त्यांच्यासोबत येणाऱ्या सैन्यातील लोकांना वतने आणि जहागिरी दिली त्यामुळे या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्रीयन किंवा मराठी भाषिक लोक आहेत.

 

 

 

 

 

 

पण त्यांना आता आपण ओळखू शकत नाही. त्यांनी कालओघात तेलगू भाषा आणि संस्कृतीचा स्वीकार केलेला आहे पण त्यांची आडनाव अजूनही महाराष्ट्रीयन आहेत.
अशाच एका कुटुंबात माझ्या गावाकडील मित्र घर जावई म्हणून गेला त्याचं गाव कामारेडी जिल्ह्यात येतं. त्याचं नाव नाथ माझ्या मुळ गावापासून जवळ जवळ १००   किलोमीटर लांबच गाव.

 

 

 

 

 

 

 

 

आमच्या गावाकडून कुणी तिकडे गेलं की त्याला फार आपरूक. अधुन मधून तो आपल्या गावी येतो व्यापारात हुशार तसेच उत्कृष्ट शेतकरी आणि सर्वांना मदत करण्याची त्याची सहज प्रवृत्ती त्यामुळे तो आमचा लाडका आहे .त्याचा आग्रह मला भरपूर होता .तुम्ही आमच्या गावाकडे या पण ते काही जमत नव्हतं.

 

 

 

 

 

पण एकदा तो योग आला पहाटे लवकर घरातून निघालो तसे पत्नीने सूचना केली आज एकादशी पंधरवडी आहे ,तीच सूचना पुन्हा कधी नव्हे ते काकूंनीही केली, त्या दोघींचं मत मला कळालं नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं ते चुकूनही मी मासांहार करू नये म्हणून त्या सूचना होत्या. त्या सूचना मी मोबाईल द्वारे मित्रांना दिल्या पण मनात शंका होती त्या गावात एकादशी कोणी पाळत असेल का?
कामारेड्डीला माझी काही कामे आटपून मी त्या मित्राच्या घरी दिवे लागणीच्या वेळी गेलो गाईचे दूध काढण्यात येत होतं.

 

 

 

 

 

 

 

गायीच्या त्या धारा काढण्याचा मधुर आवाज माझं स्वागत करत होता. गायीच्या दुधाचा चहा माझ्या मित्राच्या पत्नीने केला होता .चहा घेत नाथ म्हणाला पुढचं काय. मी त्याला सांगितलं काहीच नाही मस्त गप्पा मारू .तशी त्या मित्राच्या पत्नीची चलबिचल मी ओळखत म्हणालो काहीही जमेल जेवायला विशेष काही करू नका. नाथ म्हणाला तसं नाही आमच्या सगळ्यांचा उपास आहे एकादशीचा आणि तिला ही भजनासाठी जायचं आहे देवळात, त्यांच्या ह्या वाक्याच मला नवल वाटलं.

 

 

 

 

 

 

 

इथेही एकादशी घरा घरात धरतात काय, त्यांनी होकार दिला. मग मी म्हणालो फराळाचं जे असेल ते जमल आणि त्यासोबत गाईचे दूध घेऊ.
आमचा पाहुणचार करून माझ्या मित्राची पत्नी भजनासाठी गेली मी आणि माझा मित्र गप्पा मारण्यात दंग झालो पण नकळत माझ्या कानावर टाळ मृदंगाचा नाद (आवाज) ऐकू येऊ लागला तसे भजनाचा आणि भजनी मंडळ मराठीतील अभंग गात होते मी सहज त्यांना विचारलं हे कोण गाते तेव्हा तो मित्र म्हणाला आमच्या

 

 

 

 

 

 

गावातली मंडळी इकडे बऱ्याच गावात असे भजनी मंडळी आहेत की ज्यांना मराठीचा चकार शब्द कळत नाही आणि मराठी बोलता पण येत नाही पण मराठी अभंग मुखोद्गत आहेत आज मला एका मागून एक आश्चर्याचे धक्के बसत होते.
उत्सुकतेने मी मित्राचा हात धरला आणि देवळात पोहोचलो त्यांच्या तालासुरात मिसळून गेलो ते अभंग गात होते त्यांचे बोल काहीसे असे होते

आहे माझ्या घरी
पंढरीची वारी
नित्यनेमाने करतो
आषाढी कार्तिकी

त्या अभंगाचे बोल माझ्या मनाला भिडले आणि आपसूक डोळ्यात पाणी भरले. ती मंडळी भजन थांबवत काय झालं म्हणून माझी विचारणा केली ते तेलगू तर मी मराठीत बोलत होतो द्विभाषीकाची भूमिका माझा मित्र नाथ करत होता. मी त्यांना सांगितले की शुद्ध भावनेचा स्पर्श मनाला झाला की मला असं होतं.

 

 

 

 

महाराष्ट्रातील पांडुरंगा चरणी माझी भक्ती आणि श्रद्धा आहे पण पंढरपूरच्या या दैवताला देवस्थान तर आहेच अनेक महान संतांची परंपरा आणि संत वांड़ग्मय जे की जीवनाचा अर्थ सांगण्यास समर्थ ही वारकरी परंपरा महाराष्ट्राचे भूषणच.
त्यांनी या अभंगाचा अर्थ मला विचारला संत वांड़ग्मयाचा भावार्थ सांगन इतकी माझी कुवत नाही आणि अधिकार तर मुळीच नाही पण जे त्यावेळेस मनात आलं ते सांगायचा प्रयत्न केला.

 

 

 

 

 

 

माणसाला जगण्यासाठी काहीतरी आधार लागतो आणि अभिमानही पाहिजे ‌‌. मग एखाद्या माणसाला जीवन जगण्याचा काहीच आधार
नाही कसा तरी तो जगत आहे आणि अभिमान बाळगावे असे त्याच्याकडे जमीन, शिक्षण, नोकरी ,संपत्ती ,आई ,वडील, पत्नी ,मुलं ,गाव ,कर्तृत्व, कलागुण काही म्हणजे काहीच नाही ‌. पण त्याच्या घरी आहे पंढरीची वारी हा त्याच्या जीवनाचा आधार आणि ही वारी किती अडचणी आल्या तरी मी आणि माझे पूर्वज करत आलो याचा त्याला अभिमान.

 

 

 

 

माझे बोलणे थांबवत मी त्यांचा निरोप घेतला माझ्या मित्राच्या मक्याच्या शेतातील माचव्यावर रात्रीची झोप घेण्यासाठी मित्रा सोबत माझी पावलं त्याच्या शेताकडे वळली. मनात विचार येऊन गेला कितीतरी पिढ्या झाल्या असतील ही लोक महाराष्ट्राला सोडून पण आजही महाराष्ट्राच्या गौरवशाली परंम्परेतील वारकरी परंम्परांचा आणि संतांचा. तसेच संत वांडग्मयाचा विसर त्यांना पडला नाही. त्या गौरवशाली इतिहासाच्या आणि वारकरी परंम्परेच्या पाऊल खुणा त्यांच्या मनावर गडद कोरल्या गेल्याचा अभिमान आणि आनंद मला झाला.

@ मी एक आनंद यात्री
राजू पाटील लच्छनकर .
मो.६३०४८७३७२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *