महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

 

 

नवी दिल्ली,दि.२८ :- सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण ३६० भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे.

थोडक्यात तपशील

ऑपरेशन कावेरी अंतर्गत विशेष विमान एसवी-३६२० जेडाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता.

 

 

महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष सुरु

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

 

सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

 

 

 

 

 

सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *