आजच्या युगात पैशाला फारच जास्त महत्व प्राप्त झाले आहे. पैशावरूनच माणसाचे मोजमाप करण्यात येऊ लागलय. पैसा आला की त्या व्यक्तीला जगातला सर्वच ज्ञान आहे आणि मग ती व्यक्ती जे सांगेल ते पूर्व दिशा पण काही अपवाद असतात काही व्यक्ती पैसा पेक्षा माणुसकीला जास्त महत्व देतात आणि मग अशा व्यक्ती समाजात वेगळा ठसा उमटवतात.

कार ने वेग पकडला होता. मी शेजारी बसलो होतो गाडी चालवणारा माझा मित्र म्हणाला कुठे जाऊत. मी सहज विनोदाने म्हणालो तू जिथे गेल्यास तिथे पोहोचणं फारच कठीण .विनोदाचा आनंद घेत आपल्या नेहमीच्या विनम्र शैलीत म्हणाला तसं काही नाही जे काम मला मिळाले ते मी प्रामाणिकपणे करतो मी त्याला म्हणालो तुला
आठवते का पंधरा वर्षांपूर्वी आपण दोघे असेच मोटरसायकलवर जात होतो आणि तुला आंबेजोगाई होऊन एमबीबीएस फायनल इयर ची परीक्षा पास झाल्याचा फोन आला होता. तो म्हणाला की मी कसे विसरेन. मग आमच्या गप्पा रंगल्या आणि त्याने त्याची गाडी माझ्या शेत शिवारात नेऊन थांबवली.
सूर्य मावळतीला होता. पाखर घरट्याकडे वळत होती. दिवसभर सूर्याने प्रचंड ताकतीने जमिनीला तापवलं होतं आता वाऱ्याने आपली जबाबदारी स्वीकारली होती जमिनीला थंड करण्याची. गाडीतून उतरून आम्ही दोघेही शेत शिवारात फेरफटका मारत होतो सहज मी त्याला एक प्रश्न केला तुला देवदूत म्हणतात तू आतापर्यंत राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत शिर्डी देवस्थानच्या हॉस्पिटलच्या माध्यमाने ३७ हजार रुग्णांना निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी झालास.
तुला महाराष्ट्र शासनाचे तसेच विविध सेवाभावी संस्थेचे अनेक पुरस्कार भेटले क़ोरोणां काळात ही तू असंख्य रुग्णाचे प्राण वाचवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा विविध खात्याचे मंत्री आमदार खासदार या साऱ्यांचा तुला संपर्क लाभला. तुला कसं काय जमतंय आणि तुला नेमका देवदूत होण्याचा प्रवास कसा सुरू झाला असं तुला वाटतं.
माझ्या प्रश्नामुळे तो थोडासा भाऊक झाला आणि म्हणाला राजू तुला तर बरंच माहित आहे कारण आपण एकमेकांच्या कायम संपर्कात होतो तुला काय वाटतं ते सांग.
मी म्हणालो, तुझ्या आई वडील साईभक्त आणि तुझी श्रद्धा व भक्ती साईबाबा वरच. लहान भावाचं तर नावच साई .तुझ्या वडिलांनी सुभाषरावजी वडगावे सरांनी तर साईबाबा मंदिर बांधले. तुझ्या आई वडिलांनी तुला लहानपणी साईबाबाच्या ओटीत टाकलं होतं अशी आठवण तुझी आई अगदी आनंदाने आम्हाला सांगते.
मला वाटतं साईबाबांना तुला सामान्य गोरगरीब जनतेचा सेवा करण्यासाठी निवड केली. वहिनी नी सुद्धा तुला अगदी मोकळी सूट दिलेली आहे म्हणून तू हे करू शकतोस. तुझ्या कुटुंबात कधी पैशाला जास्त प्राधान्य दिलं नाही. जे आहे त्याच्यात समाधान मानणारी ती माणसं.
तुझ्या मनातला सेवाभाव आणि सामान्य माणसाविषयी आपुलकी आणि बरेच काही या साऱ्याच मिश्रण तुझ्यात आहे पण मला आज तुझ्याकडून ऐकायचा आहे . तुझा हा देवदूत होण्याचा प्रवास.
तो सांगू लागला, आंबेजोगाई मेडिकल कॉलेजला एमबीबीएस प्रथम वर्षात मला थोडा उशिरा प्रवेश मिळाला. पुढे नाशिकला यूनिवर्सिटी बनली फक्त मेडिकल कॉलेज साठी आणि काही रुल बदलले त्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्यात आम्हा चार मित्रांचा पुढाकार होता .आंदोलन चिघळल आणि चार पैकी आमच्या दोन मित्रांनी विष प्राषण केलं आणि त्यात त्यांचा अंत झाला. अक्षरशा आमच्या डोळ्यापुढे त्यांनी प्राण गमावले .त्यांच्या आई-वडिलांच्या, भावा बहिणीचा आक्रोश आजही माझ्या मनाला अस्वस्थ करतो.
त्या आठवणी आजही मला प्रचंड वेदनादायी आहेत. या घटनेमुळे मी पूर्णपणे खचुन गेलो होतो. जीवन निरस झालं होतं पण आई-वडिलांनी मला सांभाळलं मोठ्या बहिणीने मायेने मला समजून घेतलं .पुढे मी एमबीबीएस पासही केलं पण या सगळ्या भानगडीमुळे तीन ते चार वर्ष मला डिग्री काढण्यासाठी उशीर झाला होता.
बोलत बोलत आम्ही शेत शिवारातील एका बोर जवळ आलो थोडीशी घशाला कोरड पडली होती माझी माणसं आमच्या भोवती होतीस त्यांनी बोरचे बटन मारलं आणि जमिनीच्या गर्भात असलेल्या त्या काळ्या पाषाणातील नितळ स्वच्छ आणि थंडगार पाणी वर आलं .
दोघांनी ओंजळीत पाणी घेतलं अन तहान भागवली तसेच त्या निळ्याभोर आकाशाच्या छताखाली काळया मातीत जाऊन विसावलो. या आणि अशाच अनेक प्रसंगात इतकं यश, प्रचंड ,प्रसिद्धी सारं काही असूनही या मित्राचं अगदी साधं राहणं हे माझ्या मनाला नेहमीच स्पर्श करून जात.
पुढील आयुष्यात अत्यंत दुःखदायी घटना ज्यामुळे त्याच्या अंतःकरणात आणि विचारात फार मोठा बदल झाला त्याला सांगायची होती . अंतःकरण भरून आलं होत एक दीर्घ श्वास घेत दुःखाचा ओढका गिळत पुढे बोलू लागला.
आई-वडिलांची इच्छा मी लग्न करावं नंतर तुला काय करायचं ते कर अशीच होती. मी होकार कळवला. नेहमीप्रमाणे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीला गेलो तेथे संस्थांच्या सेवाभावी दवाखान्यात एका डॉक्टरची गरज होती आणि मी त्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून माझं काम चालू केलं लग्नात तर तुम्ही सर्वच मित्र हजर होतातच की.
पुढे मी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी परीक्षा दिली त्याचा रिझल्ट लागला आणि त्यात मी उत्तीर्णही झालो त्यादिवशी मी मुंबईत होतो. मी आनंदाने घरी फोन केला तर मला दुसरी आनंदाची बातमी कळली मला मुलगा त्याच दिवशी झाला होता. सारं काही जगच आनंदात आहे की काय असं मला वाटू लागलं .
मला त्या दिवशी आकाश ठेंगण झालं होतं त्याच आनंदाने मुंबईहून नांदेडला कसा आलो ते कळलं नाही नांदेडहून आंबेजोगाईला माझ्या सासरवाडीत गेलो त्या माझ्या मुलाला पाहिलं पत्नीची विचारणा केली .ती माझी पहिली आणि अखेरची भेट माझ्या मुलाची ठरणार होती.
आई-वडिलांना भेटावं म्हणून माझ्या मुळ गावी गेलो. अचानकपणे काळान माझ्या मुलावर झडप घातली . माझं मूल दगावलं . होत्याचं नव्हतं झालं. नुसता दुखाचा आगडोंब उसळला आणि काळजात कायमचा न मिटणारा घाव करून गेला.
घरी आणलेल्या पेढ्यांचा सुगंधही मला आता वेदना देत होता .आई-वडिलांनाही अति दुःख झालं होतं .पत्नीला जेव्हा मी भेटलो तिची तर अवस्था भयावह झाली होती .सारं दुःख बाजूला सारून तिला सांभाळणं गरजेचं होतं तिला आता माझी गरज होती. सगळे डोक्यातले विचार सोडले.सरळ शिर्डी गाठली. साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालो . सर्व चिंता बाबावर सोडून मी माझ्या कामात गुंतलो.
सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघितल्यानंतर एका घटनेमुळे माझ्याकडे दवाखान्याचं प्रशासनाचं काम आलं त्यात मग डॉक्टरांना ड्युटी देणे त्यांचे वेळापत्रक बनवने आणि रुग्णांची व्यवस्था बघणे .हळूहळू माझी पदोन्नती होत गेली .माझी निष्ठा, कामाचा आवाका, मेहनत आणि पैशाच्या बाबतीत स्वच्छ पारदर्शक कारभार या सगळ्या गोष्टीमुळे मला देवस्थानच्या अध्यक्ष आणि विश्वास्त मंडळांनी मेडिकल डायरेक्टर केलं आणि देवदूत बनण्याचे सर्व सुरू झालं.
2013 साली त्यावेळेसच्या केंद्र सरकारन राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत गरजू रुग्णांची पाच लाख पर्यंत ची कुठलीही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार होती. सुरुवातीला देवस्थानच्या दवाखान्याला स्वतः खर्च करावा लागणार होता मग नंतर ते शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा केंद्र सरकार देणार होतं .या योजनेअंतर्गत अनेक रुग्णांना फायदा मिळाला अनेकांचे प्राणी वाचले .

प्रशासनात येणाऱ्या कागदपत्राची तडजोड रुग्णांना कशी करायची ते समजावून सांगत .एखाद्या वेळेस काही कमी असेल तर मी माझे अधिकार वापरत पण त्या रुग्णाला या योजनेचा लाभ करून देत.
मी पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही .
पण मला आज पर्यंत अनेक पुरस्कार मिळालेत साईबाबाच्या कृपेने आज मला एक मुलगा व एक मुलगी आहे आयुष्यात मी समाधानी व आनंदी आहे पण आमच्या मूळ गावी झालेल्या सत्कार समारंभात आमचे सर्वांचे आवडते शिक्षक माननीय एच एस खंडागळे सरांनी मला देवदूत म्हणून संबोधले तोच मला माझा मोठा पुरस्कार वाटतो.
गोरगरीब रुग्णांची शस्त्रक्रिया करत त्यांचे प्राण वाचल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव व त्यांच्या मनातील माझ्या विषयीचा आदर भावना मला पुढील कामाची ऊर्जा पुरवतात.
काळोख वाढला होता आमची पावलं गाडीकडे वळत होती पण या काळोख्यात एक सेवा मूर्ती डॉक्टर प्रीतम सुभाषराव वडगावे माझ्यासोबत चालत होता. या सेवामुर्तीच्या तेजान अंधार उजळून निघत होता.
मी एक आनंद यात्री
@राजू पाटील लच्छनकर
6304873724
विनंती. , आपल्या प्रतिक्रिया माझ्या फेसबुक पेजवर *मी एक* *आनंदयात्री, राजू पाटील* *लच्छनकर* नोंदवू शकता.

