एकाच व्यक्तीने एका वर्षात किती उपक्रम राबवावेत आणि कोणकोणत्या क्षेत्रात ती एकच व्यक्ती कार्यमग्न असावी याला मर्यादा आहेत. पण गोदाकाठचं असं एक व्यक्तीमत्व आहे की, जे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, धार्मिक व वेळप्रसंगी इतर कुठल्याही क्षेत्रात विविध उपक्रमासह आजवर मैदानात उतरत आलं आहे. ते व्यक्तीमत्व म्हणजे धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ

ठाकूर…. पंधरा, विस, पंचवीस नव्हे तर तब्बल ८३ उपक्रम राबविणारे दिलीपजी ठाकूर हे गोदाकाठचे सेवाधर्म निभावणारे तपस्वी व्यक्तीमत्व आहेत.
दिलीपभाऊ ठाकूर मूळात नास्तिक विचारधारेतील व्यक्तिमत्व, पण आयुष्यात काही प्रसंग येतो की तुमचं आयुष्य चांगल्या किंवा अनअपेक्षित वेगळ्याच वळणावर जातं. साधारणपणे १९८९ दरम्यान, दिलीपभाऊ यांच्या मातोश्री काही आजारामुळे त्रस्त होत्या, हैदराबादच्या खाजगी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर अचानकपणे त्यांच्या मातोश्रीना दिसेनासे झाले.
आईची ही परिस्थिती पाहून सहाजिकच संवेदनशील मुलगा म्हणून दिलीपभाऊ ठाकूर हे प्रचंड घाबरून गेले. त्याच रुग्णालयात असलेल्या श्रीगणेश मुर्तीपुढे नास्तिक व्यक्तीमत्व असलेले दिलीपभाऊ ठाकूर नतमस्तक झाले. आणि आईची दृष्टी परत आली. हा चमत्कार असो की वैद्यकीय उपचारादरम्यानची घटना असो, पण आपल्या आईला संकटातून बाहेर काढण्यासाठी ज्या
ज्या प्रार्थनेची व उपचाराची मदत झाली त्याप्रती, एक संवेदनशील मुलगा नेहमीच कृतज्ञ असतोच. अगदी याच प्रमाणे दिलीपभाऊ श्रीगणेशाचे कट्टर भक्त (आस्तिक) आणि वैद्यकीय सेवेप्रती कृतज्ञ असलेले व्यक्तीमत्व झाले. समाजातील विविध घटना पाहून मदत, सेवाकार्य करत असताना, काळाच्या ओघात दिलीपभाऊ ठाकूर आज ८३ हून अधिक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. तब्बल ७७ संस्थेनी त्यांच्या कार्याची दखल घेतली तर आजघडीला ते विविध ८४ पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांच्या विविध उपक्रमापैकी काही उपक्रम खालील प्रमाणे आहेत.
*सेवा ही संघटन:* कोरोना महामारी दरम्यान, कोरोना लसीकरण केंद्रावर अनेक ठिकाणी दहा ते पंधरा दिवस सेवा पुरवण्यात आली. परंतु दिलीपभाऊ ठाकूर यांनी नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रात ज्या दिवसापासून लसीकरण सुरू आहे त्या दिवसापासून सलग ९०१ दिवस दररोज मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्किट वितरित करत आले आहेत. हजारो नागरिकांना त्यांनी सेवा पुरवली आहे.
जोपर्यंत नांदेड शहरात लसीकरण सुरू आहे तोपर्यंत हे साहित्य वाटप करण्याचे दिलीपभाऊ ठाकूर यांनी ठरवले होते, आणि त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या दिवसापासून ते लसीकरणाच्या शेवटच्या दिवसापर्यंत सेवा देऊन एक जागतिक विक्रम केला आहे. *भाऊचा डबा:* गेल्या १३ वर्षात लोकसहभागातून दिलीपभाऊ ठाकूर यांनी शासकीय रुग्णालय, तसेच रयत धर्मादाय रुग्णालय आणि श्री गुरुजी धर्मादाय रुग्णालय मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना
लकसहभागातून ७ लाखापेक्षा जास्त जेवणाचे डबे पुरवले आहेत. दररोज किमान ५० डब्याची निरंतर सेवा त्यांच्यातर्फे सुरू आहे. *नरेंद्र देवेंद्र महोत्सव:* गेल्या २१ वर्षापासून नांदेड शहरात दोन दिवसाचे मोठे कवी संमेलनाचे आयोजन दिलीप ठाकूर हे करत आलेले आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी मराठी हास्य दरबार आणि दुसऱ्या दिवशी अखिल भारतीय विराट हिन्दी कवी संमेलन घेण्यात येते. हजारो रसिक या कार्यक्रमाला उपस्थित असतात. याच कार्यक्रमांमध्ये दरवर्षी एका व्यक्तीला ₹११००० देऊन नांदेड भूषण पुरस्कार देण्यात येतो. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवराला
₹५००० देवून सुधाकर पत्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. *मायेची उब :* गेल्या चार वर्षापासून दरवर्षी दोन हजारापेक्षा जास्त ब्लॅंकेटचे वितरण दिलीपभाऊ ठाकूर हे लोकसहभागातून करत असतात. हिवाळ्यात ४० मध्यरात्री फिरून दररोज ५० ब्लॅंकेट रस्त्यात कुडकुडत झोपलेल्या बेघरांच्या अंगावर ते टाकतात. *कायापालट* : गेल्या ३७ महिन्यापासून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड शहरातील वेडे, अपंग निराधार, बेघरांना एकत्रित करून त्यांची कटिंग दाढी करणे, आंघोळ घाळणे, नवीन कपडे
देणे, ते तयार व्हावे यासाठी १०० रुपयाची बक्षीसी देणे आणि चहा फराळाची व्यवस्था दिलीपभाऊ ठाकूर हे स्वत: करत असतात. त्याचप्रमाणे उपेक्षितांसोबत दिवाळी, होळी, रक्षाबंधन असे सण साजरा करून उपेक्षितांच्या जीवनात नवीन उभारी निर्माण करतात. *भाऊचा माणुसकीचा फ्रिज:* नांदेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रुपये एक लाख किंमतीचा मोठा फ्रिज दिलीपभाऊ ठाकूर यांनी बसवला आहे. यामध्ये नागरिक आपल्या घरात असलेले शिल्लक खाद्यपदार्थ आणून ठेवतात तसेच ज्याला आवश्यकता आहे त्याला
ते घेऊन जातात. दररोज सकाळी किमान ४० ते १२० डबे या ठिकाणी वाटप करण्यात येतात. नांदेड शहरात कोणीही व्यक्ती उपाशी झोपू नये व अन्न वाया जाऊ नये म्हणून दिलीप ठाकूर यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत एकही दिवस या सभेमध्ये खंड पडलेला नाही. दिवाळीत एक क्विंटल मिठाई त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. ज्याचा लाभ गरजूंना मिळाला आहे. *बहना भाग मत जाना:* गेल्या १७ वर्षापासून दिलीप ठाकूर हे स्वखर्चाने युवती संस्कार शिबिर घेऊन त्यात मुलींना नामवंत वक्त्यांच्या मार्गदर्शनाने चांगले संस्कार दिले जातात. लव्ह जिहाद विरुद्ध लढण्याची मानसिक तयारी करून घेतल्या जाते.यामुळे
अनेक तरुणींनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय बदललेला आहे. *कृपाछत्र* : दर पावसाळ्यात २००० पेक्षा जास्त छत्र्याचे वाटप गरजूंना दिलीपभाऊ ठाकूर हे करत असतात. हा उपक्रम गेल्या चार वर्षापासून नियमित सुरू आहे. *चरण सेवा:* उन्हाळ्यात अनवाणी फिरणाऱ्या बेघरांना जेवढे वर्ष असेल तेवढ्यात संख्येत चपलांचे वाटप चार वर्षापासून करण्यात येते. *उन्हाळ्यात पानपोई :* गेल्या २१ वर्षापासून दिलीपभाऊ ठाकूर हे उन्हाळ्यात पानपोई चालवत असतात.लोकनेते गोपीनाथ मुंडे
यांच्या दुःखद निधनानंतर या पानपोईला त्यांनी कै.गोपीनाथ मुंडे पाणपोई असे नाव दिलेले आहे. *अमरनाथ यात्रा:* गेल्या २२ वर्षापासून दरवर्षी दिलीपभाऊ ठाकूर हे शेकडो भाविकांना घेऊन अमरनाथ यात्रेचे आयोजन करतात. यामध्ये ना नफा ना तोटा या तत्त्वावर नागरिकांना सुविधा देण्यात येते.काश्मीर च्या परिस्थितीची जाणीव व्हावी या उद्देशाने दिलीपभाऊ ठाकूर यांनी सुरू केलेल्या यात्रेत आतापर्यंत हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. *रक्तदान शिबिर:* आतापर्यंत ५६ रक्तदान शिबिराचे दिलीपभाऊ ठाकूर यांनी आयोजन करून सहा हजारापेक्षा जास्त रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या आहेत.त्यांनी स्वतः ४२ वेळा
रक्तदान केले आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर २७ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांनी ३८२ रक्ताच्या बाटल्या तातडीने मुंबईला पाठवल्या होत्या. *गोदावरी गंगापूजन:* हरिद्वार, वाराणसी नंतर भारतात सर्वात मोठे गोदावरी गंगापूजन नांदेड मध्ये दिलीपभाऊ ठाकूर गेल्या २२ वर्षापासून आयोजित करत आहेत. हजारो महिला यावेळी आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेला गोदावरीची आरती करतात. नदीपात्रात दिवे सोडतात. हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी हजारो नांदेडकरांची उपस्थिती
असते. *पदयात्रा* : नागरिकांना चालण्याची सवय व्हावी यासाठी दिलीपभाऊ ठाकूर हे नियमित पदयात्रेचे आयोजन करतात यामध्ये दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला नांदेड ते सत्य गणपती अशा १५१ पदयात्रा त्यांनी काढलेल्या आहेत शेकडो भाविकांना घेऊन दरवर्षी तिसऱ्या श्रावण सोमवारी नांदेड ते औंढा नागनाथ अशी पदयात्रा दिलीप ठाकूर काढतात तसेच दत्त जयंतीला दरवर्षी नांदेड ते माहूरगड पदयात्रेचे आयोजन ते सातत्याने करत आहेत. *स्वच्छता मोहीम:* दिलीपभाऊ ठाकूर हे सातत्याने स्वच्छता मोहीम राबवीत असतात. वेगवेगळ्या प्रसंगाचे औचित्य साधून स्वच्छता
कर्मचाऱ्यांना विविध वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो. *मोठ्या पडद्यावर क्रिकेट स्पर्धा दाखवणे:* क्रिकेट पटू व्हायचे स्वप्न दिलीप भाऊंचे पूर्ण झाले नसले तरी त्यांच्या नसानसात क्रिकेट प्रेम भरलेले आहे. १९९९ पासून आतापर्यंत सलग पंधरा वेळा त्यांनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा मोठ्या पडद्यावर दाखविल्या आहेत. विश्वचषकातील भारताचा विजय असो अथवा नीरज चोप्राचे ऑलिम्पिक गोल्ड मेडल असो त्या त्यावेळी भव्य विजय रॅली त्यांनी काढलेली आहे. याशिवाय जलतरण स्पर्धा,
चालण्याच्या स्पर्धा, व इतर विविध क्रिडा स्पर्धा ते नियमित आयोजित करतात. *राष्ट्रभक्ती चित्रपट मोफत दाखवणे:* द कश्मीर फाईल, केरळा स्टोरी या सारखे चित्रपट शेकडो तरुणी आणि महिलांना मोफत दाखवून त्यांनी जनजागृती केली आहे. याशिवाय शालेय साहित्य वाटप, निराधारांना फळे वाटप, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, वृक्षारोपण यासारखे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ८३ उपक्रम भाजपच्या वतीने दिलीपभाऊ ठाकूर हे वर्षभरात राबवित असतात.
दिलीपजी ठाकूर सध्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पक्षाने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात दिलीपजी ठाकूर यांचा सक्रिय सहभाग असतो. नुकतीच “धन्यवाद मोदीजी” ही संकल्पना त्यांनी प्रभावीपणे मांडली आहे. या उपक्रमामध्ये स्वतः दिलीप ठाकूर यांनी चार हजार सहाशे लाभार्थ्यांचे पत्र जमा करून वरिष्ठांकडे पाठवले आहेत. दिलीपभाऊ ठाकूर यांच्या समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संघटनांनी त्यांना आत्तापर्यंत ८४ पुरस्कार दिलेले आहेत. यात महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, देवदूत
उपाधी, कर्मयोगी, दीनबंधू सेवा पुरस्कार, नांदेड के सांता, शान ए नांदेड, इन्स्पायर पर्सनालीटी, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, माँ जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभाई पुरस्कार, मातोश्री गंगूताई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय कृपा पुरस्कार, तिरंगा गौरव पुरस्कार,
लॉयन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवार्ड, कृतज्ञता सेवेचा पुरस्कार, राजरत्न पुरस्कर, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता, मराठी अपडेटचा कृतज्ञता सन्मान आदींचा यात समावेश आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळातील केलेल्या कामाची दखल घेऊन तब्बल २२ संस्थांनी कोरोना योद्धा हा पुरस्कार त्यांना दिला आहे. विशेष म्हणजे यातील १६ संस्था मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्र बाहेरच्या आहेत. नुकताच समाज कल्याण विभागाने संवेदनशील कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन देखील त्यांचा गौरव केला आहे.
दिलीपभाऊ ठाकूर हे चांगले वक्ते आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. जनमानसात त्यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. त्यामुळे अनेक दानशूर नागरिक त्यांच्या सामाजिक उपक्रमाला मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून, गोदाकाठच्या या सेवा तपस्वी व्यक्तीमत्वाला मराठी अपडेट माध्यम समूहाच्या वतीने कृतज्ञता सन्मान देवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
(लेखक: बापूसाहेब पाटील, नांदेड जिल्हा काँग्रेस सचिव तथा संस्थापक संपादक, मराठी अपडेट समुह)

