नांदेड मध्ये एकाच वेळी पोलीस ठाण्यांची व कार्यालयांची साफसफाई मोहीम संपन्न.

नांदेड़ दि.१४ :- मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय कार्यालयांसाठी कामकाज व परिसर सुधारण्यासाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा ठरवून दिला आहे. दिनांक १५ एप्रिल रोजी, निश्चित केलेली (१००) दिवसांची मुदत पूर्ण होत आहे.

सदर उपक्रमाचा एक भाग म्हणून, काल शासकीय सुट्टीचे दिवशी परिक्षेत्रातील नांदेड परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यात सर्व (९१) पोलीस ठाणे, (२६) उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, (५) अपर पोलीस अधीक्षक कार्यालये व (४) पोलीस अधीक्षक कार्यालयांत एकाच वेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी साफसफाई हाती घेतली होती.

 

 

 

(१००) दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत, पोलीस स्टेशनमध्ये अनेक वर्ष पडून असलेली जुनी वाहने व इतर मुद्देमाल बऱ्याच अंशी कमी करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. त्याचप्रमाणे, पोलीस ठाणे व पोलिसांच्या इतर कार्यालयांत अनेक वर्ष पडून असलेले जुने अभिलेख देखील नष्ट करण्यात आले आहेत.

या कामकाजा सोबतच, जतन करून ठेवावयाचे अभिलेख प्रत्येक पोलीस ठाणे व कार्यालयांत सुव्यवस्थितपणे लावण्यात आले असून कार्यालयांच्या इमारती व इमारतीच्या बाहेरील परिसराच्या सुशोभीकरणावरही अनेक अधिकाऱ्यांनी भर दिला आहे.

 

पोलीस ठाण्यात व इतर कार्यालयांत अनेक वर्ष पडून राहिलेले जुने अभिलेख, कालबाह्य फर्निचर व मुद्देमालातील वाहने कमी झाल्याने पोलीस ठाणे व कार्यालय परिसरातील परिस्थिती बदलली असून

 

 

त्यामुळे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कार्यक्षमतेवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.

 

 

पोलीसांनी सुरू केलेली ही मोहीम यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील व पोलीस हे नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अधिक सकारात्मक मानसिकतेने पुढे येतील, अशी अपेक्षा पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी व्यक्त केली आहे.