नांदेड प्रतिनिधी, दि.०४ऑगस्ट :- नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानात किनवट तालुक्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा भव्य सन्मान करण्यात आला.
आयआयएम, नागपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सन्मान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कर्डीले यांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, तसेच आकांक्षित तालुक्याचे समन्वयक पांडुरंग मामीडवार हे उपस्थित होते.
किनवट तालुक्यात संपूर्णता अभियान अंतर्गत शिक्षण, आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण अशा विविध क्षेत्रात केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे हा सन्मान मिळाला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष केंद्रित करत समाधानकारक परिणाम साधले आहेत.
या सन्मानामुळे जिल्ह्यातील प्रशासनिक यंत्रणेचे मनोबल उंचावले असून, आकांक्षित तालुक्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पावले ठरत आहेत.

