देगलूर प्रतिनिधी,दि.०६:- लेंडी प्रकल्पाच्या कामांतील गंभीर अनियमितता, दिरंगाई व नागरिकांच्या समस्यांबाबत सुरू असलेल्या आमरण उपोषणाला लोकसभा खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.

खासदार चव्हाण यांनी अॅड. इर्शाद पटेल यांच्या आमरण उपोषणावर प्रतिक्रिया देताना संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वेळेत उपाययोजना न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत म्हटले की, अॅड. पटेल यांची मागणी ही फक्त जनतेच्या हक्कासाठी असून, त्यांची कार्यपद्धती अभ्यासू, शांततामय व संघर्षशील आहे.
पत्रात खासदार चव्हाण यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, अॅड. पटेल यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करावी, जेणेकरून प्रलंबित प्रकल्पातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील.
तसेच, त्यांनी उपोषणात मांडण्यात आलेल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आणि तातडीने ठोस निर्णय घेण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.
