“समाजसेवकाची खरी व्याख्या हरवत चालली आहे”

✍️ अग्रलेख

“समाजसेवकाची खरी व्याख्या हरवत चालली आहे”

स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसेवक ही एक वेगळीच उंची असलेली संकल्पना होती. देशाची गुलामी संपवण्यासाठी कार्य करणारे लोक केवळ राजकारणी नव्हते, तर ते समाजसेवकही होते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, राणीसाहेब जिजाऊ, सावरकर अशा अनेक

 

व्यक्तींनी घरदार, सुखसोयी, आपल्या आयुष्याचे व्यक्तिगत ध्येय सोडून समाजासाठी व देशासाठी अहोरात्र झटले. त्यांच्या त्यागामुळे आणि समाजहितासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना समाजसेवकाची खरी उपाधी लाभली.

 

 

स्वातंत्र्यानंतरही अनेक थोर व्यक्तींनी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास या क्षेत्रांत आयुष्य झोकून दिले. बाबा आमटे, अण्णा हजारे, सुधामुर्ती, मेधा पाटकर यांसारख्या समाजधुरिणांनी समाजसेवा ही केवळ प्रसिद्धीसाठी नसून प्रत्यक्ष कृतीसाठी असते हे दाखवून दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजात परिवर्तन घडले आणि वंचितांना दिलासा मिळाला.

 

 

परंतु आजच्या काळात समाजसेवक ही संज्ञाच विकृत होत चालली आहे. सोशल मीडियावर काही व्यक्ती चिरीमिरी देऊन, किरकोळ फळे-वस्तू वाटप करून वा फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करून स्वतःला समाजसेवक म्हणवून घेतात. काही जण तर स्वतःला “स्वयंघोषित समाजसेवक” म्हणून

 

उभारून घेतात. ही प्रवृत्ती खऱ्या समाजसेवकाचा अपमान आहे. कारण समाजसेवक होण्यासाठी त्याग हवा, कष्ट हवेत, स्वतःचे सुख बाजूला ठेवून समाजासाठी काम करण्याची खरी निष्ठा हवी.

 

 

आजची ही बनावट “समाजसेवकगिरी” खऱ्या समाजसेवेवर पांघरूण टाकत आहे. लोकांमध्ये खऱ्या समाजसेवकांविषयी संशय निर्माण होत आहे. परिणामी पुढील पिढी समाजासाठी निःस्वार्थपणे काम करण्यास घाबरते.

 

 

म्हणूनच आज गरज आहे ती खरी आणि खोटी समाजसेवा यामधील सीमारेषा ओळखण्याची. समाजानेही बाह्य दिखावा न पाहता खऱ्या कर्तृत्वाला सलाम केला पाहिजे. अन्यथा “समाजसेवक” ही गौरवशाली उपाधी हळूहळू अर्थहीन होऊन जाईल.

  गजानन गंगाधरराव बिडकर

       ‘मुख्य संपादक’

      सा.महिमा खादीचा

      मो.९८९०३७६५९५