देगलूरात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा दुसरा दिवस.

 

देगलूर प्रतिनिधी,दि ०१:- देगलूर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व गोर-गरीब नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख मिरा मोहीउद्दीन यांनी कालपासून (३० सप्टेंबर) उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

 

आज दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरु असून, दरम्यान अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शविला आहे.

 

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. या नुकसानीसंदर्भात शासन व प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.

 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये — अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देणे, शेतकऱ्यांचे विजबिल माफ करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी माफ करणे, पीक विमा तात्काळ मिळावा, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा १८ तास करावा, देगलूर शहर व तालुका पुरग्रस्त भाग घोषित करावा, मनमानी विजबिल बंद करावे आदींसह १४ ठोस मागण्यांचा समावेश आहे.

 

विशेष म्हणजे आज उपोषणाचा दुसरा दिवस असूनही या उपोषणाची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मात्र, वाढत्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप प्राप्त होईल असे चित्र दिसून येत आहे.