मराठी साहित्य परिषद तेलंगण, हैदराबाद आयोजित “मधुरव – बोरु ते ब्लॅाग”हा कार्यक्रम २१ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय विद्या भवन येथे सादर झाला.
सभागृहाबाहेर सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,मुंबई आयोजित आणि मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, हैदराबाद यांच्या समन्वयातून “मायबोली मराठीचा जयजयकार “या फलकाने तसेच जयश्री सुलाखे यांनी कार्यक्रमाला साजेशी काढलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नाट्य कलाकार मधुरा वेलणकर साटम, IPS श्री महेश भागवत, मराठी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री सुरेश कुलकर्णी ,म. सा.प. च्या अध्यक्ष डॅा विद्या देवधर आणि कार्यवाह डॅा शैलजा जोशी ह्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. सन्माननीय पाहुणे म्हणून जेष्ठ अभ्यासक डॅा न. गो . राजूरकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नीही उपस्थित होते.
डॅा.ना.गो. नांदापूरकर लिखित मराठी गीत डॅा अर्चना अचलेरकर यांनी अतिशय सुंदर गायले. डॅा विद्या देवधरांनी त्यांच्या प्रास्ताविक भाषणात सर्व मान्यवर व कलाकारांचे स्वागत केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणून हा आजचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत असे सांगितले तसेच आज पितृपक्षातील अमावस्या आणि आजच्या ह्या कार्यक्रमानी आम्ही आज हयात नसलेल्या मराठी साहित्यकारांना जणू श्रद्धांजलीच वहात आहोत असेही त्या म्हणाल्या.
जेष्ठ अभ्यासक न.गो. राजूरकर यांचा उल्लेख करत त्या म्हणाल्या मराठी साहित्य परिषदेने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे. नुकतेच त्यावर राजूरकर सरांची मुलाखत घेतली असून हैदराबाद मुक्ती संग्रामावर त्यांची चार भाषणे प्रसारित झाली आहेत . आमच्या या नवीन उपक्रमाला आपला भरपूर प्रतिसाद मिळावा असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
“बोरू ते ब्लॅाग” हा कार्यक्रम संगीत, नाट्य, नृत्य मिश्रीत असून इ. स.पूर्व २००पासून म्हणजे सात वाहन काळापासून ते आज पर्यंतची मराठी भाषेची वाटचाल अतिशय खुमासदारपणे कार्यक्रमातून ऐकायला मिळाली.
गाथा सप्तशती पासून सुरू झालेला मराठी भाषेच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे , कुवलयमाला या ग्रंथात आलेल्या ओव्यांचा उल्लेख,”दडमडह सामलिंगे सहिरे कलह सिलेह “हा दोन भांडकुदळ माणासाचा ७ व्या शतकातील उल्लेख , मराठीचा पहिला शिलालेख , जात्यावरच्या ओव्या , घेत महानुभाव पंथ, संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत एकनाथ , समर्थ रामदास यांनी केलेले मराठी भाषा समृद्धीचे योगदान, छत्रपती शिवाजीमहाराज यांनी तयार केलेला मराठी भाषेतील राजकोश, मोरोपंत यांच्या आर्या, बहिणाबाई यांच्या ओव्या, शाहिरांचे पोवाडे अशा मराठी भाषेतील अनेक गोष्टी या कार्यक्रमात उलगडत गेल्या व संत, पंत, तंत , कवी यांच्या माध्यमातून साहित्य व संस्कृती कशी विकसित झाली हे अतिशय सुंदरपणे मधुराताईंनी सादर केले.
सामान्य मराठी माणसाला अगदीच अपरिचित असलेल्या काही गोष्टीही या नाट्यात चपखलपणे बसविल्या आहेत.जसे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेली पहिली छापील ज्ञानेश्वरी, वामनदादा कर्डक यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर १००००लिहिलेली गाणी,तसेच राम गणेश गडकरी यांनी जोडाक्षर विरहित चिमुकली इसापनिती खास बाल मुलां करीता लिहिली याची माहिती , छपाई यंत्र, शाईची कथा इ. रोचक गोष्टींची माहितीही मधुराताईंनी दिली.
नारायण ठोसर (संत रामदास स्वामी) हे बोहल्यावर उभे असतांना सावधान हे शब्द ऐकल्याबरोबर निघून जातात पण त्यावेळी त्यांची वधू जी हार घेऊन उभी असते तिचे मनोगत व्यक्त करणारी मधुराताईंच्या आज्जींनी लिहिलेली एक कविताही मधुराताईंनी सादर केली.
मधुरव – बोरू ते ब्लॉग या नाटकाची निर्मिती मधुरा वेलणकर साटम यांनी केली असून या नाटकाची संहिता डॅा.समीरा गुजर यांची आहे तर नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे यांनी केले आहे. मधुरा वेलणकर साटम,आकांक्षा गाडे आणि आशिष गाडे या तीन कलाकारांनी अतिशय सुंदरपणे अगदी मराठीचा पहिला शिलालेख, कुवलयमालातील जात्यावरच्या ओव्यांपासून ना. व. टिळकांच्या “परीटा येशील का परतुनी”ही कविता घेऊन २०२२ पर्यन्तचा प्रवास ओघवती भाषेत नाट्यरूपाने रंगमंचावर दृक श्राव्य रूपाने प्रस्तुत केला.
बोरु ते ब्लॅाग हा रंगभूमीवरील एका वेगळ्या धाटणीचा, सांस्कृतिक अभिमान जागवणारा नाट्य प्रयोग आहे हे सतत जाणवत होते. तसेच हा कार्यक्रम शिक्षणप्रद असूनही उपदेशात्मक नाही हे विशेष. ८वी ९ वी वर्गातील रा. प.शाळेतील विद्यार्थी तसेच शाळे बाहेरील शाळेतील विद्यार्थी असे ७० विद्यार्थीही या कार्यक्रमाला आले होते हे विशेष.नाटकाच्या शेवटी मधुरा वेलणकर यांनी प्रेक्षकांना काही प्रश्न विचारून प्रेक्षकांनाही सहभागी करून घेतले.
हैदराबाद मधील त्यांचा हा प्रयोग ५२ वा प्रयोग होता. अशा प्रयोगातून मधुरा वेलणकर या मराठी भाषेवरील प्रेम, अभिमान आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीत रुजवत आहेत .
कार्यक्रमाच्या मध्यंतरात मराठी साहित्य परिषदेने सन्मानीय पाहुण्यांचा आणि सर्व कलाकार तसेच तांत्रिक संघाचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॅा. शैलजा जोशी यांनी केले. आभारप्रदर्शन डॅा. विद्या देवधर यांनी केले.
नाट्यगृह व्यवस्था आणि रंगमंच, ध्वनी, प्रकाश व्यवस्था यासाठी विमल नाट्य समाज आणि गोविंद जहागीरदार यांची बहुमोल मदत झाली. मराठी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनीही नाट्यप्रयोगा दिनी तिकीट व्यवस्था, सभागृह व्यवस्था आणि रंगमंच व्यवस्थेसाठी बहुमोल मदत केली.
मराठी साहित्य परिषदेने मनुष्यबळ कमी असतानाही हैदराबाद येथील मराठी भाषिकापर्यन्त मायबोलीची कहाणी पोचविण्याचा प्रयत्न केला आणि तो १००% यशस्वी झाला.
डॅा. शैलजा जोशी
