पत्रकारांचा सन्मान – समाजाचा सन्मान
अलीकडच्या काळात पत्रकारांवर होत असलेले अपमानास्पद वक्तव्य, अवमानकारक वागणूक आणि काही वेळा तर थेट हल्ल्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. देगलूर येथे घडलेली घटना ही त्याचाच एक भाग आहे. पोलीस निरीक्षकांनी पत्रकाराशी केलेले अपमानास्पद वक्तव्य ही केवळ एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक चूक नाही, तर संपूर्ण पत्रकार समाजाला कमी लेखण्याचा प्रकार आहे.
पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. एखाद्या गावात, शहरात किंवा राज्यात काय घडते, याचे वास्तव जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतो. शासन आणि नागरिक यांच्यामधला तो दुवा आहे. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, अडचणी, समस्यांचे प्रामाणिक चित्रण पत्रकार माध्यमातून करतो. त्यामुळेच पत्रकाराला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटले जाते.
परंतु दुर्दैवाने, जेव्हा पत्रकार समाजातील प्रश्न मांडतो, तेव्हा सत्ताधारी, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती यांना हे प्रश्न अप्रिय वाटतात. त्यातूनच पत्रकारावर अपमानास्पद वक्तव्य, धमक्या किंवा कधी प्रत्यक्ष हल्ले होतात. ही परिस्थिती लोकशाहीला घातक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे.
पत्रकारांवर होणारे हल्ले थांबविणे ही शासनाची जबाबदारी आहे. तसेच, सामान्य नागरिकांनीही पत्रकाराचा सन्मान केला पाहिजे, कारण पत्रकार समाजाच्या हितासाठी काम करतो, वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे. प्रशासकीय अधिकारी असोत किंवा सर्वसामान्य व्यक्ती – प्रत्येकाने पत्रकाराला सहकार्य व आदर दिला पाहिजे.
पत्रकारांचा सन्मान करणे म्हणजे समाजाचा सन्मान करणे होय. पत्रकार सुरक्षित असतील तरच समाजाचे प्रश्न प्रभावीपणे जनतेसमोर येतील आणि प्रशासनाला जबाबदार ठरवता येईल. त्यामुळे, पत्रकारांवर होणारे अपमान, अन्याय आणि हल्ले त्वरित थांबविले पाहिजेत, हीच वेळची गरज आहे.
✍️ गजानन गंगाधरराव बिडकर
संपादक – साप्ताहिक महिमा खादीचा
