अर्धापूर दि.०४ :-तालुक्यातील येळेगांव (कारखाना) येथील तरूण शेतकरी परमेश्वर नारायण कपाटे (वय-२४) यांनी अतिवृष्टीमुळे पिकांची सर्व नासाडी झाली आता पुढे जगायचं कसं,या विवंचनेत चिठ्ठी लिहून गळफास लावल्याची घटना दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. मागील दोन दिवसांत ही दुसरी घटना असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीतील खरिप पिकांच्या नुकसानीमुळे अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील निवृती कदम यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली होती.त्यानंतर मुलांच्या मृत्यूच्या वियोगाने त्याच रात्री वडील सखाराम कदम यांचाही मृत्यू झाला.
ही घटना ताजी असतानाच येळेगाव येथील परमेश्वर नारायण कपाटे यांच्याकडे तीन भावंडांना वडिलोपार्जित दीड एकर शेतजमीन असून मयत परमेश्वर हे दुधाचा व्यवसाय करित होते.
शुक्रवारी सकाळी दुध विक्रीसाठी नेण्याची वेळ झाली मात्र परमेश्वर कपाटे घरी दिसत नव्हता.त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली असता घराच्या पाठीमागेच एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पँटच्या खिशात सापडली.मयत परमेश्वर कपाटे यांच्या पश्चात आई-वडील,दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.
