आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लाभार्थ्यांना वेळेत दर्जेदार उपचार द्या – पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील.

 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी, दि २६ :- शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत. आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत विनाअडथळा पोहोचवून उपचार प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता व समन्वय राखण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

 

 

 

 

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध योजनांचा पालकमंत्री डॉ.विखे पाटील यांनी आढावा घेतला. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

 

 

 

 

बैठकीस आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, आमदार विक्रमसिंह पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय वेळेत व गुणवत्तापूर्ण उपचार मिळाले पाहिजेत. त्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेमध्ये अधिक समन्वय साधून काम करावे. रुग्णांना विनासायास उपचार मिळावेत. शासनाच्या आरोग्य योजनांबाबत व्यापक स्वरूपात जनजागृती करावी.

 

 

 

 

 

शासकीय व खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवून उपचारांची व्याप्ती वाढवावी, आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. योजनांतर्गत उपचारांची गुणवत्ता कायम ठेवावी, असेही पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.