देगलूर प्रतिनिधी दि.३१ :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा अनंतराव पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांच्या स्मरणार्थ देगलूर शहरात जागा उपलब्ध करून भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी धनाजी जोशी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धनाजी जोशी हे राष्ट्रीय ओ.बी.सी. फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य – मराठवाडा विभागाचे अध्यक्ष असून त्यांनी एक व्यक्ती म्हणून पुढाकार घेत ही मागणी प्रशासनासमोर मांडली आहे. निवेदनात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सिंचन प्रकल्प, कृषी विकास, ग्रामीण भागाचा कायापालट, पायाभूत सुविधा तसेच प्रशासनातील धाडसी व लोकाभिमुख निर्णयांमुळे स्व. अजितदादा पवार यांनी सामान्य जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केल्याचे निवेदनात नमूद आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी कायम ठाम भूमिका घेतली असून त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील अनेक विकासकामे मार्गी लागल्याचेही सांगण्यात आले आहे.
नुकत्याच २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. देगलूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना एका ओबीसी नेत्याकडून ही मागणी करण्यात आल्याने ती सध्या देगलूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
भावी पिढीला त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी व त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी, यासाठी स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे मत धनाजी जोशी यांनी व्यक्त केले. मुख्याधिकाऱ्यांनी सदर निवेदन स्वीकारून याबाबत योग्य त्या स्तरावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
निवेदनामध्ये देगलूर नगरपरिषदेच्या हद्दीतील एक एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच या संदर्भातील निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सामाजिक बांधिलकीतून एका व्यक्तीने पुढाकार घेत मांडलेली ही मागणी सध्या विविध स्तरांतून चर्चेत असून तिला पाठिंबा मिळत आहे.
