हैदराबाद प्रतिनिधी दि.०२:- भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर सरस्वती वंदना सादर करण्यात आली.
या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून श्री रोहित चेबरोलु, श्री गजानन बिडकर, झारखंड एकता मंचचे श्री जयंत शर्मा व श्री राजू देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. संस्थेचे अध्यक्ष श्री उदयकुमार नाईक यांनी संस्थेच्या २३ वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेत विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. सचिवांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पाडले.
प्रमुख पाहुणे श्री गजानन बिडकर यांनी संस्थेचे यशस्वी वाटचालीबद्दल अभिनंदन करत ‘पत्रकारिता व आव्हाने’ या विषयावर विचार मांडले. ‘भाषा सेतू’ या त्रैमासिकाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. संस्थेची स्वतंत्र वेबसाईट तयार करून साहित्यिक विचार जगभर पोहोचवावेत तसेच युवा पिढीला संस्थेशी जोडून त्यांच्या कल्पनांना वाव द्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. आपल्याला विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष व संपूर्ण टीमचे आभार मानले.
यानंतर श्री जयंत शर्मा यांनी समाजात एकता व संघटन शक्ती वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. श्री राजू देशपांडे यांनी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा स्थानिक स्तरावर सन्मान केल्यास इतरांना प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘भाषा सेतू’ त्रैमासिकाच्या चालू अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अंकाच्या संपादकीय, रचना व पृष्ठ मांडणीबद्दल प्रधान संपादक व संपादक मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या लता संधी मॅडम यांनी यूजीसीवर आधारित आधुनिक कविता सादर केली.
कोंडे सर प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी संदेश पाठवून अल्पोपहाराची व्यवस्था केली. कार्यक्रमाचा समारोप श्री मिलिंद पाठक यांनी केला. संस्थेचे कार्य व त्रैमासिक डिजिटल माध्यमातून पुढे नेण्यासाठी संस्था सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुम्मा जनार्दन, चंद्रकांत जामवाले, तसेच पी. नारायणा, मानसी पाठक, अंकिता पाठक, अर्चना जोशी, गिरीश बिडकर, गौरव बिडकर, माधुरी बिडकर, प्रतीक पाठक आदींचा उत्स्फूर्त सहभाग व प्रतिसाद लाभला.
