तहसील कार्यालय स्थलांतरावरून देगलूरमध्ये संताप; मध्यवर्ती ठिकाणीच ठेवण्याची मागणी.

 

देगलूर प्रतिनिधी:-नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील तहसील कार्यालयाचे प्रस्तावित स्थलांतर गावाबाहेरील कृषी कार्यालयाच्या आवारात करण्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

 

त्यांच्या म्हणण्यानुसार, तहसील कार्यालय शहराबाहेर गेल्यास सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. सरकारी कामांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत प्रवास खर्च वाढून आर्थिक भार सहन करावा लागेल. तसेच, सुमारे ३ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी जाणे सर्वांसाठी शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

 

 

धनाजी जोशी यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन देत तहसील कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागातच ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, तहसील कार्यालय जर शहरातच राहिले तर उपजिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस आणि न्यायालय यांसारखी महत्त्वाची कार्यालये नागरिकांना सहज उपलब्ध राहतील.

 

 

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.