धर्माबाद प्रतिनिधी :- धर्माबाद शहरातील मौल्यवान वनजमिनीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्लॉटिंग प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही धनदांडग्यांकडून वनखात्याच्या जमिनीवर अनधिकृतपणे प्लॉटिंग सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर तहसील प्रशासनाने तत्काळ दखल घेत कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
या प्रकरणात तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी सक्रिय भूमिका घेत वनविभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. अनधिकृत प्लॉटिंग तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
माहितीनुसार, संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संशयास्पद फेरफार करण्यात आला आहे. भूमी अभिलेख कार्यालयात कोणतीही नोंद नसताना प्लॉटिंग कशाच्या आधारावर सुरू आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांना धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात वनविभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “दुर्लक्ष की जाणीवपूर्वक झोपेचे सोंग?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या वनजमिनीवर उघडपणे बेकायदेशीर काम सुरू असताना संबंधित विभाग निष्क्रिय का राहिला, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तहसील प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे या प्रकरणाला वेग आला असून, आता वनविभाग कोणती ठोस कारवाई करतो, दोषींवर गुन्हे दाखल होतात का आणि बेकायदेशीर प्लॉटिंग थांबवली जाते का, याकडे धर्माबादकरांचे लक्ष लागले आहे.
