उमरी रेल्वे स्टेशनवर जनजागृती अभियानाची सुरुवात.
उमरी ता. प्रतिनिधी :- प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच रेल्वे नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी उमरी रेल्वे स्टेशन येथे जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) धर्माबाद यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांना विविध नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानांतर्गत प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. विना तिकीट किंवा प्लॅटफॉर्म तिकीटाशिवाय स्टेशन परिसरात फिरणे हा रेल्वे कायद्यानुसार गुन्हा असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर जाण्यासाठी फुटओव्हर ब्रिजचा वापर करणे बंधनकारक असून ट्रॅक ओलांडल्यास रेल्वे ॲक्ट कलम 147 अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली.
स्टेशन परिसरात दुचाकी, ऑटो किंवा चारचाकी वाहने केवळ पार्किंगमध्येच उभी करावीत, अन्यथा रेल्वे कायदा कलम 159 अंतर्गत वाहन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. याशिवाय, स्टेशनवर न थांबणाऱ्या गाड्यांची चेन ओढून गाडी थांबवणे किंवा उतरल्यास रेल्वे कायदा कलम 141 अंतर्गत गुन्हा दाखल होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
या अभियानाद्वारे सर्व प्रवाशांनी नियमांचे पालन करावे व सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन आरपीएफ धर्माबादचे सब-इन्स्पेक्टर राम आशिष कुमार यांनी केले.
या प्रसंगी रेल्वे डीआरयूसीसी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पारसमल दर्डा, उमरी रेल्वे स्टेशनचे सुप्रिंटेंडंट भरत लाल मीना, मोहम्मद गनी पाशा (आरपीएफ निजामाबाद) यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
