काँग्रेसच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध ; सोशल मीडियावर तीव्र नाराजी, काँग्रेसला घरचा आहेर.
देगलूर प्रतिनिधी : नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी खासदारांची करण्यात आलेली नियुक्ती सध्या पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरत असून, काही काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देगलूर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहम्मद रऊंफ अब्दुल हफिस यांनी आपल्या भूमिकेतून पक्षश्रेष्ठींना सवाल उपस्थित करत ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी केली आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, “खासदार साहेबांविषयी आमचा कोणताही वैयक्तिक विरोध नाही. मात्र त्यांच्याकडे आधीच मोठे पद असताना जिल्हाध्यक्षपदाची गरज नव्हती. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे खासदारांना जिल्हाध्यक्ष करण्यात आलेले दिसत नाही. मग नांदेड जिल्ह्यातच असा निर्णय का घेण्यात आला?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आगामी एमएलसी, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ओबीसी मतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी ओबीसी समाजातील जमिनीवर काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी आदरणीय श्री रामदास पाटील सुमठानकर यांचे नाव पुढे करत, “दूरदृष्टी असलेले आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व जिल्हाध्यक्षपदी आल्यास काँग्रेसला पुन्हा जिल्ह्यात सत्ता मिळवणे सोपे जाईल,” असे म्हटले.

यासोबतच त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व नांदेडच्या खासदारांना थेट प्रश्न विचारत, “सृजन संघटन अभियानांतर्गत निवडलेल्या 72 जिल्हाध्यक्षांपैकी एससी, एसटी, ओबीसी, एनटी, अल्पसंख्यांक आणि महिलांना किती टक्के प्रतिनिधित्व दिले?” याचे उत्तर मागितले आहे. “जर वंचित व मागास समाजाला फक्त विशिष्ट सेलपुरते मर्यादित ठेवले जात असेल, तर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत कसा येणार?” असा सवालही त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले होते, महिलांना 50 टक्के आरक्षणाची भूमिका मांडली होती, त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले.
दरम्यान, काँग्रेसमधील या नाराजीच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “काँग्रेसला घरचा आहेर” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
