प्रतिभा निकेतन-प्रज्ञा निकेतन १९८० बॅचचे भव्य स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

प्रतिभा निकेतन-प्रज्ञा निकेतन १९८० बॅचचे भव्य स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

नांदेड प्रतिनिधी: प्रतिभा निकेतन हायस्कूल आणि प्रज्ञा निकेतन हायस्कूल, होळी नांदेड येथील सन १९७९-८० च्या दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे भव्य स्नेहसंमेलन रविनगर येथील आरंभ बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. तब्बल ४५ वर्षांनंतर बालपणीचे मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि संपूर्ण परिसर भावनिक वातावरणाने भारावून गेला.

 

 

 

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नांदेडचे ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित व्यापारी पांडुरंग कन्नावार होते. यावेळी माजी शिक्षणाधिकारी अॅड. श्रीपाद यशवंतराव देशपांडे, व्यंकटेश जिंदम, लक्ष्मीकांत गज्जेवार, नंदकिशोर झोळगे, देवेंद्र देशमुख, छायाताई माळवतकर, डॉ. उर्मिला मुंदडा आणि वसुधा कंधारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

 

प्रास्ताविकात व्यंकटेश जिंदम यांनी १९८० च्या बॅचमधील मैत्री, एकोप्याची परंपरा आणि सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. उद्घाटनपर भाषणात अॅड. दिलीप ठाकूर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख बक्षिसे देण्याची सूचना केली. त्यांच्या या प्रेरणादायी विचारांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कार्यक्रमात सहभागींचा नवपरिचय, विविध मनोरंजक खेळ, कला गुणदर्शन, गीत-संगीत आणि कथ्थक नृत्याचे सादरीकरण यामुळे वातावरण आनंदमय झाले. माजी शिक्षणाधिकारी अॅड. श्रीपाद देशपांडे यांनी स्वरचित कविता सादर केली, तर देवेंद्र देशमुख यांच्या विनोदी सादरीकरणाने उपस्थितांचे विशेष मनोरंजन केले. श्रीनिवास देशमुख, नंदकिशोर झोळगे, लिला जाजू, विलास गायकवाड आणि सुशिला पालीमकर यांनी सुमधुर गीते सादर केली. वर्षा पाटसकर आणि सुधा टोके-जोशी तामसेकर यांनी बालपणीच्या कविता सादर करून सर्वांना पुन्हा शालेय जीवनात नेले.

 

 

 

 

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सिनेकलावंत सुनील बागडे यांचे कथ्थक नृत्य सादरीकरण. त्यांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. यावेळी सर्वांसाठी पारंपरिक “धोंडे आणि आमरस” भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा पाटसकर, सुशिला पालीमकर आणि प्रा. स्वाती चौधरी यांनी केले. शेवटी अरुणा कुरूमभट्टे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

या स्नेहसंमेलनासाठी जपान, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा तसेच देशातील विविध शहरांमधून माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक भोरे, राजेश बच्चेवार, राजगोपाल पल्लौड, बालवीरसिंग जहागीरदार, गणेश देशपांडे आणि श्रीनिवास देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.