नांदेड प्रतिनिधी :- सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात 40 वर्ष्यापासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे नांदेडचे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना प्रतिष्ठेचा ‘अतुल्य भारत पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अमरावती मध्ये राष्ट्रीय प्रज्ञा अलंकरण समारोह एवं संत समागम २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील भव्य सोहळ्यात अॅड. दिलीप ठाकूर व सौ. जयश्री ठाकूर यांनी हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे हा सन्मान ॲड. ठाकूर यांना प्राप्त झालेला ११४ वा पुरस्कार ठरला आहे.
ज्ञान उदय फाउंडेशन आणि रेडियम टॅलेंट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या संयुक्त विद्यमाने १४ जून २०२६ रोजी अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील संत, विचारवंत, समाजसेवक, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे संयोजक ॲड. क्रांती महाजन यांनी ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले की, “समाजसेवा, धर्मकार्य आणि मानवतेची निःस्वार्थ सेवा यांचा विचार केला तर ॲड. दिलीप ठाकूर हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या २३ वर्षांत त्यांनी २५ लाखांहून अधिक जेवणाचे डबे गरजूंना वितरित करून अन्नदानाचा एक अनोखा विक्रम घडविला आहे.प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी रस्त्यावरचे बेसहारा, असहाय, दुर्बल तसेच मानसिक संतुलन गमावलेले नागरिक यांना सन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी गेल्या ७७ महिन्यांपासून अविरतपणे केस-दाढी कटिंग, स्नान, नवीन वस्त्र वितरण आणि प्रोत्साहनपर आर्थिक मदतीचा उपक्रम राबविला जात आहे. गेल्या सात वर्षांत हिवाळ्यात १४ हजारांहून अधिक उबदार चादरी, पावसाळ्यात ‘कृपाछत्र’ उपक्रमांतर्गत १४ हजारांपेक्षा अधिक छत्र्या आणि ‘चरण सेवा’ उपक्रमाद्वारे १४ हजार चप्पलांचे वितरण करण्यात आले आहे.
नांदेड शहरात अन्न वाया जाऊ नये आणि कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने त्यांनी सुरू केलेला ‘भाऊचा मानवता फ्रिज’ हा उपक्रम आजही अनेक गरजूंना आधार देत आहे. सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले असून सत्यगणपती, औंढा नागनाथ, माहूरगड, रत्नेश्वरी यांसारख्या विविध पदयात्रांचे आयोजन करून धर्म, आरोग्य आणि संस्कार यांची जनजागृती केली आहे.‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर गेल्या २६ वर्षांपासून अमरनाथ यात्रेचे आयोजन करून त्यांनी शेकडो ज्येष्ठ नागरिकांना हिमालयातील पवित्र दर्शन घडविले आहे. तसेच गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नांदेडमध्ये आयोजित होणाऱ्या भव्य ‘गोदावरी गंगा पूजा’ उपक्रमात हजारो महिलांचा सहभाग घडवून आणला आहे.
स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, मोफत औषध वाटप यांसारखे ९० हून अधिक उपक्रम ते वर्ष भरात सातत्याने राबवत आहेत. कोरोना काळातही त्यांनी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत घरपोच अन्नसेवा पोहोचविली.अशा बहुआयामी आणि निःस्वार्थ समाजसेवेबद्दल त्यांना देश-विदेशातील विविध संस्थांकडून आतापर्यंत ११४ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. संपूर्ण भारतात इतक्या व्यापक आणि सातत्यपूर्ण पद्धतीने समाजसेवा करणारे व्यक्तिमत्त्व शोधणे अत्यंत दुर्मीळ आहे,” असे गौरवोद्गार ॲड. क्रांती महाजन यांनी काढले.
या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अमरावती हे ॲड. दिलीप ठाकूर यांचे सासरचे शहर आहे. त्यामुळे आपल्या सासुरवाडीत राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्वीकारण्याची संधी मिळाल्याने हा सन्मान त्यांच्या दृष्टीने अधिक भावनिक, संस्मरणीय आणि अभिमानास्पद ठरला आहे.या प्रसंगी सौ. शोभा व विजयसिंह चौहान, सौ.सुषमा व नरेंद्रसिंह चौहान, सौ. शोभा व नंदकिशोरसिंह गौर, राहुल चौहान यांच्या सह अनेक जण उपस्थित होते. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
