औरंगाबाद,दि. ०३ डिसेंबर : औरंगाबाद व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून अनेक समाजभिमुख बदल घडविले. या काळात हजारो शेतकऱ्यांना आधार, दिशा दिली व त्यांचा आत्मविश्वास वाढविला. या भरीव योगदानाबदल महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सपत्निक ‘वंदे मातरम कृषी सन्मान २०२१ ’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजभवनात पार पडला.
वंदे भारत विकास फाउंडेशन व ॲडराईज इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.
यावेळी आमदार आशिष शेलार, ॲडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, व्याव्स्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारे, प्रगतिशील शेतकरी व पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी धीरज जुनघरे, डॉ सदानंद राऊत, शेती हवामान तज्ज्ञ डॉ उदय देवळाणकर, ज्ञानेश्वर बोडके, डॉ सूर्यकांत गुंजाळ, नारायणगाव ग्रामोन्नती कृषी मंडळ संस्थेचे अनिल मेहरे, कृषी पर्यटन तज्ञ चंद्रशेखर भडसावळे, कुलगुरू डॉ संजय सावंत, व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.