जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश; एकही बाधित मदतीपासून वंचित राहता कामा नये

अमरावती, दि. २९ : जिल्ह्यात अवकाळी पावसाने व काही ठिकाणी गारपिटीने विवीध भागात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात तत्काळ व सविस्तर पंचनामे करावेत. एकही बाधित व्यक्ती मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्ह्यात आज ठिकठिकाणी पाऊस पडून नुकसान झाले. चांदुर रेल्वे तालुक्यातील मौजे तळेगाव दशासर येथील गजानन बापुराव मेंढे (वय ४०) यांचा आज सायंकाळी वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल. शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

नुकसानाची सविस्तर माहिती घ्या

मोर्शी, चांदुर बाजार या तालुका परिसरात काही ठिकाणी गारपीट झाली आहे. याबाबत व इतरही ठिकाणी पावसाने झालेल्या  नुकसानाचे सविस्तर पंचनामे प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत. प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्यावी. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे. एकही बाधित व्यक्ती भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसानीचे अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश सर्व उपविभागीय व तहसील कार्यालयांना देण्यात आले आहेत.

नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसानीचे अहवाल देऊन मदतनिधी बाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा,असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *