औरंगाबाद, दि. १२ : दिव्यांग,अनाथ,तृतीयपंथीय आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांना रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यासाठी जिल्ह्यात अंत्योदय योजनेसाठी १६६४ कार्ड धारक तर प्राधान्य लाभार्थी योजनेसाठी ५७ हजार लाभार्थीचा नवीन इष्टांक मंजूर करण्यात आला असून त्यांना स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत सूचना दिल्या.
यावेळी पुरवठा उपायुक्त वामन कदम,जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब शिंदे,वैधमापन विभागाचे सहनियंत्रक श्री. चाटे, उपनियंत्रक रमेश दराडे, जिल्हा पणन अधिकारी श्रीमती पांडो आढावा बैठकीस उपस्थित होते.

शिवभोजन केंद्रातून जिल्ह्यात प्रतिदिन ६६०० थाळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. सदरील शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासोबतच केंद्रावरील स्वच्छतेबाबत नियमित तपासणी करण्यात यावी. यासाठी जिल्हा प्रशासनाने जेवणाचा दर्जा, स्वच्छता आणि तयार जेवणाची गुणवत्ता व चव तपासावी, जेणेकरून गरजू गरीब नागरिकांना योग्य दर्जाच्या जेवण थाळीचा लाभ मिळण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील धान्य गोडाऊनमध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही बरोबरच माथाडी कामगारांना स्वच्छतागृह व चेंजिंग रुम उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. नवीन लाभार्थीसाठी शिल्लक राहिलेल्या धान्यातून इष्टांक वाढवून देण्यात येत आहे, याची अंमलबजावणी करताना संबंधिताना धान्याचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना मंत्री भुजबळ यांनी पुरवठा यंत्रणेला दिल्या. स्वस्त धान्य दुकान देत असताना लाभार्थी स्थानिक,दिव्यांग आणि महिला बचतगटांना रेशन दुकान देताना प्राधान्य देण्यात यावे.
ग्राहकांच्या तक्रारीची दाखल घेऊन तातडीने दूर करण्यात यावी, यामधून अन्न नागरी पुरवठा विभागाचे कार्य जास्तीत जास्ती लोकाभिमुख असावे असे यावेळी सांगितले, जिल्ह्यातील बायो डिझेल विकणाऱ्यांची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. गॅस सिलेंडरचा वाहनांमध्ये वापर आणि काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.याबरोबरच वैधमापन व नियंत्रण विभागाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
