१८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता तर ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू
सातारा, दि.२५ : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमध्ये जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित झाली असून १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता, ३ हजार २४ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले असून एनडीआरएफची एक टीम कार्यरत असल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
जिल्ह्यातील एकूण १६७ गावे पूर्णत: व २१२ गावे अंशत: अशी एकूण ३७९ गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील ४४ गावे पूर्णत: व ७ गावे अंशत: अशी एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत. कराड तालुक्यातील एकूण ३० गावे अंशत: बाधित झालेली आहेत. पाटण तालुक्यातील १० गावे पूर्णत: व ६० गावे अंशत: अशी एकूण ७० गावे बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील ११३ गावे पूर्णत: बाधित, सातारा तालुक्यातील १३ गावे अंशत: बाधित, जावली तालुक्यातील १०२ गावे अंशत: बाधित झाली आहेत.
जिल्ह्यातील १८ जणांचा मृत्यू, २४ जण बेपत्ता तर ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू
जिल्ह्यातील एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून २४ जण बेपत्ता आहेत तर ३ हजार २४ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाई तालुक्यात ३ मृत व्यक्ती, २ जण बेपत्ता व २० मृत पशुधन, कराड तालुक्यात ३ हजार मृत पशुधन (कोंबडी), पाटण तालुक्यात १२ मृत व्यक्ती व २० जण बेपत्ता, महाबळेश्वर तालुक्यात १ मृत व्यक्ती व २ मृत पशुधन, सातारा तालुक्यात २ मृत पशुधन, जावली तालुक्यात २ मृत व्यक्ती व २ जण बेपत्ता झाले आहेत.
जिल्ह्यातील १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जण स्थलांतरित
जिल्ह्यातील वाई, कराड पाटण व महाबळेश्वर तालुक्यातील एकण १ हजार ३२४ कुटुंबातील ५ हजार ६५६ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये वाई तालुक्यातील ७२ कुटुंबातील ३९० जण, कराड तालुक्यातील ८७६ कुटुंबातील ३ हजार ८३६ जण, पाटण तालुक्यातील ३२५ कुटुंबातील 1 हजार ३०० जण, महाबळेश्वर तालुक्यातील ५१ कुटुंबातील १३० जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 3 एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून एका टिमची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांनी दिली.