भंडारा, दि. १७ : जिल्ह्यातील नदी – नाल्यांना आलेला पूर ओसरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पूरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भंडारा जिल्ह्यात ४२ निवारागृहांत ३३१३ पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला आहे. आज (दि. १७) रोजी पाच वाजता कारधा लहान पुलाच्या धोका पातळीपेक्षा पाणी अधिक म्हणजे २४७.७० मीटर जलप्रवाह होता, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
भंडारा शहरातील समाजमंदिर, शाळा, सामाजिक सभागृह आदी पाच ठिकाणी पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, ग्रामीण भागात ३७ ठिकाणी पूरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती
पुजारीटोला धरणाची ६ दारे उघडली असून त्यामधून १२८.३१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धापेवाडा बॅरेजमधून ७६४४.५१ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू असून गोसेखुर्दच्या ३३ दाराव्दांरे १५०७२.२५ क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे.
जिल्ह्यात आजपर्यत सरासरी १२९ टक्के पाऊस झाला असून भंडारा शहरातील १०, पवनी तालुक्यातील ४, तुमसरमधील तामसवाडी ते डोंगरला, मोहाडी तालुक्यातील ६ व लाखांदूरमधील लाखांदूर ते सोनी ते वडसा रस्ता असे एकूण २२ रस्ते बंद असल्याची माहिती या कक्षाने दिली आहे.
मंगळवारी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने भंडारा शहरातील ३५४, कारधा ७८, गणेशपूर ८०, भोजापूर ६९, सालेबर्डी ३, दाभा १२, कोथुर्णा २०, दवडीपार येथील १, करचखेडा येथील १२, पिंडकेपार येथील १, कोरंभी येथील ४, लावेश्वर ७, खमारी १२, टाकळी १० कुटुंबाना निवारागृहात आसरा देण्यात आला आहे. तुमसर, मोहाडी, लाखांदूर एकूण ८६४ कुटुंबातील ३३१३ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी निवारा देण्यात आला.


