केंद्र सरकारच्या वतीने हिंगोली येथे युवा उत्सव-इंडिया@२०४७ चे आयोजन नेहरु युवा केंद्र संघटन १६ मार्च रोजी आयोजित करणार ‘युवा उत्सव’ आणि ‘युवा संवाद’

 

 

 

हिंगोली, दि. १५ :-  युवा शक्तीच्या चैतन्यातून ‘स्वातंत्र्याचा  अमृतमहोत्सव’ साजरा करण्यासाठी  केंद्र सरकाच्या हिंगोली येथील  नेहरु युवा केंद्र संघटन (एनवायकेएस), बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय हिंगोली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दिनांक १६ मार्च, २०२३ रोजी बाबूराव पाटील महाविद्यालय येथे एक ‘युवा उत्सव’ आणि ‘युवा संवाद’ आयोजित करत आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११.०० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते होणार असून यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पालीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त जिल्हाधिकारी के. आर. परदेशी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, बाबूराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य जयवंत भोयर, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 

या युवा  उत्सवात मान्यवर मार्गदर्शन करतील तसेच जिल्ह्यातील १५ ते २९  वयोगटातील युवक व युवती विकसित भारताचे लक्ष्य या विषयावरील  कविता लेखन, वक्तृत्व, सामुहिक  न्यृत्य, चित्रकला या स्पर्धांसह मोबाईल फोटोग्राफी या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक गटातील ३ स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येईल. तसेच स्पर्धेत भाग घेणा-या सर्व युवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 उत्सवाचा एक भाग म्हणून तरुण कलाकार, लेखक, छायाचित्रकार, वक्ते, पारंपरिक कलाप्रकारांचे अभ्यासक आणि सक्रीय क्लब सदस्य भारताचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि मूल्ये सार्वजनिक प्रवाहाच्या केंद्रस्थानी आणून तळागाळापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत चळवळीचे नेतृत्व करतील. १५ ते २९  वयोगटातील युवक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रत्येक स्तरावरील विजेते पुढील स्तरात प्रवेश करतील.

 

 

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान घोषित केलेल्या पंचप्राण (पाच संकल्प) या संकल्पनेवर युवा संवाद भारत @ २०४७ मधील संवाद आणि चर्चा आधारित असेल.  हे पंचप्राण आहेत – (१विकसित भारताचे ध्येय (२राष्ट्रीय एकता आणि एकजूट (३वसाहतवादी मानसिकतेची  कोणतही खूण राहू देऊ नका (४नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना (५आपल्या वारशाचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगा.

 

 

 

 

 

विविध कार्यक्रमांमध्ये तरुणांना सहभागी करुन देशभक्ती आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मूल्ये पुन्हा जागृत करणे हा युवा उत्सव आणि युवा संवाद उपक्रमांचा उद्देश आहे. ‘युवा शक्ती’चे दर्शन घडवण्यात आणि देशातील तरुणांमध्ये ‘पंच प्राण’ या पाच संकल्पांना बळकट करण्यास यामुळे मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *