शेती हे एक परिपूर्ण चक्र आहे शेतीला पूरक म्हणजे गोपालन शेती हे काही एका माणसाने करायचं काम नाही तो संपूर्ण कुटुंबाला काम देणारा व्यवसाय आहे. शेतीला गोपालनाची जोड मिळाली की मग त्या कुटुंबाला परिपूर्णता येते शेतीला लागणारे बैल याच गाईपासून तयार होतात गाईचे दूध आरोग्याला चांगले गोमूत्र आणि शेन तर जमिनीला नवसंजीवनी देणारे.

शेतीचे व्यावसायिकरण यांत्रिकीकरण झाले ट्रॅक्टर आले काळानुसार हे योग्यच होतं पण गोपालनाचा फार मोठा सांस्कृतिक वारसा आपण गमावलो. शेतीचे तुकडे पडत गेले आणि मग १०० एक्करचे ५० एक्कर, २५ एक्कर, वरून ५, १० एकर जमिनीची वाटणी शेतकऱ्याला मिळत गेली त्यामुळे बैल जोडी ठेवणे परवडणारे नव्हते एक बैल जोडी किंवा एक औत ठेवण्यासाठी पंचवीस एकर जमीन लागते, ट्रॅक्टर मुळे शेतीची कामे सहज व वेगाने होऊ लागली आणि बैल जोडी हळूहळू लुप्त होऊ लागली.
शेतकऱ्याची शान बैल जोडी शेती करताना मला चांगले बैल ठेवण्याचा एक छंद च जडला. थोडाफार आर्थिक नुकसान होतं आणि माणसांना त्रास पण! माणसाने मालकाचा छंद म्हणून तोही सहन केला. आजोळ कडील लाल कंधारी जातीची बैल आणि माझ्या गावाकडील तेलंगणातील पांढरे बैल अंगावर बारीक काळे ठिपके हे बैल माझ्या लहानपणीचे आकर्षण च. देशात अनेक गोवंश होते उत्कृष्ट प्रतीचे .वर्षानुवर्षी आपल्याच वंशात संकर झाल्यामुळे त्यांचे दूध देण्याची क्षमता कमी होत गेली .
कुठेतरी रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंना नैवेद्य द्यायचा त्यांचे दर्शन घ्यायचे किंवा गाईची महती सांगणारे व्हिडिओ एखाद्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकायचे किंवा मग फेसबुक पोस्ट बस आणि स्वतःला गोरक्षक समजायचं गाय, बैल, गोरं, कालवड, गाभण गाय, औताचे बैल, लावणीचे गोरं काहीच माहित नाही .आयुष्यात त्यांनी कधी शुद्ध गाईचे दूध बघितले नाही गोमूत्र गाईचे खाद्य त्यांना माहित नाही अशी मंडळी एसीत बसून गोरक्षणाच्या गप्पा मारतात तेव्हा आपल्या समाजात शेती व गोपालन या दोन विषयात मूर्खपणाची अतिउच्च पातळी गाठली असे वाटते.
महाराष्ट्रातील लाल कंधारी, देवणी ,खिल्लारी राजस्थानची कांकरेज ,गुजरातची गिर, उत्तर भारतातील थारपारकर, साहिवाल, लाल सिंधी, कर्नाटकातील औरादी, तेलंगणातील पांढरी हांडी बांडी. ही देशी गोवंश जवळजवळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
पांढरी अंगावर काळी बारीक ठिपके असलेली काळी बाडीं बैल जोडी माझ्याकडे होती. अवाढव्य शरीर आणि कामाला मजबूत तेवढीच रागीट.
मी दिलेला खुराक बारामाही पाणी असल्यामुळे नेहमी हिरवा चारा ,तुरीचे भोस ,सोयाबीनचे काड ,साळीचे तनिस हे विविध प्रकारचे खाद्य. ही जनावरं तयार ही झाली. पण का कुणास ठाऊक माणसांना मारायला शिकली.
कदाचित सर्व काम ट्रॅक्टरने करत असल्यामुळे त्यांना काम जास्त नव्हते अंगातली मस्ती ते ह्या न त्या कारणाने दाखवू लागले. कामाला बहाद्दर पण औताला जुंपनच कठीण. एके दिवशी कहरच केला माझ्याच माणसाच्या अंगावर चाल करून गेली आणि माझ्या एका माणसाच्या हाताला इजा झाली. हातावर पोट घेऊन जगणारी ही माणसं हातच निकामी झाले असते तर मग ते पुढे काय करू शकले असते या विचारानं मन पिळवटून गेलं. रागाच्या भरात म्हणालो बोलवून आणा इऱ्याला यांना खाटकालाच कापतो.
इरबा बैलाचा व्यापारी बैल व्यापार बराच अवघड. इरबा आला. मी त्याला म्हणालो सांग बैलांची किंमत. तो म्हणाला मारणाऱ्या बैलांची काहीच किंमत नाही दुसरं कोणतं आयब असलं तर चाललं असतं. आयब हा बैल व्यापारातील एक शब्द. शेतकऱ्यांच्या जनावरांना काहीतरी नाव ठेवणारा .शींगाची ठेवण मागे पुढे राहू नये, केसांचे भवरे कुठे राहावेत ,शेपूट किती लांब असावे ,डोळे कसे असावे, पोटाचे ,पाठीवरील हाड कशी असावी ,नाकपुड्या कशा असाव्यात ,पाय एकाच रांगेत पडावे असे एक ना विविध कारणाने आयब ठरवायचं .
मी म्हणालो दुसर आयब सांग . इरबा म्हणाला एकाला मोंडी हाड आहे आणि एक रंगात गेलयं. मी म्हणालो घरची वासरं मस्ती आली म्हणून देऊ लागलो कशाच आयबं आणि कशाचं काय. तुम्ही व्यापारी शेतकऱ्याच्या जनावराला भाव मिळू नये म्हणून हे सर्व नाटक. जमवुन घेऊन जा आणि लाल कंधारी चार जाती गोर्हे बघ.
अदंत,दोन दाती ,चार दाती, सहा दाती, आठ दात आले की मग जुडलेली, पुढील आयुष्य एक धुर्याचे, दोन धुर्याचे असे मोजतात. दात जुडायला चार ते पाच वर्ष लागतात पुढे अकरा ते बारा वर्षे ते बैल काम करतात.
इरबा जुनी बैल घेऊन गेला आणि मी सांगितल्याप्रमाणे एक रंगी एक शिंगी लाल कंधारी बैलाचे चार जाती जोड शोधून ठेवला. बैल बाजारात माझी माणसं मी इरबा गेलो बैल बघितले मला फार आवडले. आयबांची विचारणा झाली आयब काहीच नव्हते. सौदा झाला बैल मालक असलेल्या शेतकऱ्याला अपेक्षित रक्कम किंबहुना थोडीशी जास्त दिली. बाजारातून बैल जोडी मोठ्या हौसेने घरी आणली विधीवत पूजा केली अन घरापुढे अंगणात शानानं बांधली.
कुटुंबात आनंदाच वातावरण होतं. ही देखणी बैल जोडी बघायला गावातूनच नाहीतर पंचक्रोशीतील गोप्रेमी जमा झाली होती ही बैल जितकी देखणी तितकीच गुणवान सर्वच बाबतीत चरायला, पेंड खायला, कामाला आणि अगदी शांत स्वभावाची. माझी तर फारच मैत्री जमली ती मला चांगलं ओळखत होती त्यातील एक बैल तर मला अक्षरशः जिभेने चाटायचा असं वाटलं संघ जोड लागली चिंता मिटली पण नाही
बैल जोडी आमच्या शेतशिवारा मध्ये रमली होती.
त्यांचं वय वाढत होतं तस ती चार दाती वरून सहा दाती झाली आणि सहा दातीवरून आठ दाती झाली जुडली पण एकच जो बैल चाटायचा मला लाड करायचा त्याला आठवा दातच आला नाही त्याला सातच दात होते. माझ्या माणसांच्या लक्षात आलं हे साताळ्या आहे. हे तर महाभयंकर आयबं मानणारी ती मंडळी. ही वार्ता माझ्या घरापर्यंत पोहोचली आणि इरबा पर्यंत .
एके दिवशी इरबा म्हणाला साताळया दारात ठेवू नये त्याचे तोंडही बघू नये तुमची माणसं म्हणू लागली होती आता याला ठेवायचं नाही. नाही राहू दे इतका जीव लावणारा जनावर काय व्हायचे ते होऊ दे असे मी म्हणालो. बरं राहत नाही ऐका माझं असं तो तळमळीने सांगत होता.
याच काळात मला एक मोठ आर्थिक नुकसान झालं याचा सर्वदोष त्या बिचाऱ्या मुक्या जनावर गेला त्यात त्याचा काहीच दोष नव्हता सारी परिस्थिती त्याच्या विरुद्ध झाली होती याची त्याला काही जाणीव नव्हती. तो आनंदाने आपल्याच मस्तीत होता.
पत्नीला वाटणारी काळजी नुकसान झालं तरी चालेल पण नवऱ्याला काही होऊ नये. काही झालं की मग सारादोष त्या साताळयाला माझी माणसं देऊ लागली. इरबाच सारखं सांगन . याला कंटाळून मी ती बैल जोडी विकण्यास तयार झालो.
त्या दिवशी दिवसभर त्या बैल जोडी सोबत राहिलो त्यांना चारा द्यायला सांगितलं पेंड खुराक दिला संध्याकाळी मन भरून त्यांची मालिश केली साताळ्या नेहमीप्रमाणे मला चाटत होता. माझी माणसं ठिकाणावर होती त्यांच्याकडे पाठ केली माझे अश्रू दिसू नये म्हणून अन इरबा ला फोनवर सांगितलं विकून टाक. आणि ठरवलं की बस आता नको यान त्या कारणाने माणसावर राग करू लागलो पत्नीन नवीन बैल जोडीचा विषय काढला की रागाने म्हणायचं, घेतो नवीन बैल जोडी पण त्यांच्या आयबा मुळे माझं काही बरं वाईट झालं तर याला सर्वस्वी तू जिम्मेदार राहशील म्हणून राग करू लागलो. इरबा तर माझ्या डोळ्यातला काटा झाला होता.
सहा महिने होऊन गेले होते माझा राग शांत झाला होता पत्नीने गावाकडे जा इरबाचा फोन आला होता असे सांगत होती. मला गावाकडे जायला संध्याकाळ झाली तसा ठिकाणावर गेलो. इरबा आणि माझी माणसं माझी वाट बघत बसले होते. मी नेहमीप्रमाणे बाजेवर बसलो आणि घुंगराचा आवाज कानावर पडला. बैलांच्या दावणीला एक गाय निवांत चारा खात होती उत्सुकतेने मी तिचं निरीक्षण केलं लाल कंधारी , दोन्ही शिंग सारखी ,काळे खूर अन काजळ लावलेली पाणीदार डोळे बघताच क्षणी गाभन असलेलं जातिवंत जनावर आहे हे मी ओळखलं.
तसा इरबा मनाला कशी वाटली गाय. मी म्हणालो जातिवंत देखणी आणि गाभन ही आहे. तो म्हणाला बरोबर तुमच्यासाठी आनलो दावं. म्होरकी आणि गाईच्या गळ्यातलं घुंगरू ही तुमच्याच आहे. मी म्हणालो जनावराला दावं आपलं बांधलं की ते आपलं होतं. हे अजून कशाला तसा इरबा म्हणाला मला माहित आहे तुमची माणसे हे मला म्हणाली आमचं जाऊ द्या वहिनीन सांगितल जनावर नसले की हयांना करमत नाही तू गाय आणून बाध .मी बघते ते काय करतात ते. राग शांत झाला जनावराविषयी प्रेम उचबळून वर आलं .उसन अवसान आणत मी म्हणालो करायचं तुम्हाला आहे मला काही नाही.
इरबा म्हणाला माणसाचं सोडा त्यांचं म्हणणं आहे की आता गायची संग जोड लावू .मी माझ्या पत्नीवर ,माझ्या माणसावर ,इरबा वर रुसलो होतो आणि त्यांनी माझा रुसवा काढला होता याचाच मला आनंद झाला आणि आनंदाने म्हणालो लाव आता एकरंगी ,एकशिंगी ,एकजाती, एकदाती गाईंची संगजोड.
@मी एक आनंदयात्री
राजू पाटील लच्छनकर
मो ६३०४८७३७२४

please visit our new portal www.newsrajya.com
