कांशीराम जरुरी है…!
पंचवीस तीस वर्षांपूर्वी आम्ही एक नारा देत होतो. त्याची आज सर्वत्र प्रचिती येत आहे. तेंव्हा ती चळवळीची जरुरी होती, आज ती देशाची मजबुरी झाली आहे. यावर्षी सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष मान्यवर कांशीरामजी यांची जयंती साजरी करीत आहेत. या निमित्ताने कांशीरामजी यांचे स्मरण केले जात आहे.
बामसेफमध्ये काम करीत असताना आम्ही कांशीरामजी घरोघर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होतो, त्यांचा बहुजनवाद समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करीत होतोत तेंव्हा लोक नाक मुरडीत होते. कोण कांशीराम ? काय केले त्यांनी ? आम्ही ओळखत नाही कोणत्या कांशीरामजी यांना, असे सर्रास बोलल्या जात होते.
कांशीराम जी यांच्या पश्चात आज त्यांचे महत्व जाणवू लागले आहे. “एकच साहेब बाबासाहेब !” आम्ही अन्य कुणाला मानत नाही असे म्हणणारे देखील कांशीरामजी यांचे कार्य आज मान्य करीत आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उर्वरित राजकीय कार्य कांशीरामजी यांनी पूर्ण केले हे त्रिवार सत्य आज मान्य केले जात आहे. त्यांच्यामुळे देशात फुले शाहू आंबेडकरी विचारांची सत्ता निर्माण होऊ शकली, देशातील बहुजन समाजात एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण होऊ शकली !
१९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी महोत्सव बहुजन समाज पक्षाने बाबासाहेबांची जन्मभूमी महू (मध्य प्रदेश) येथे साजरा केला. त्यावेळी निघालेल्या रॅलीत मान्यवर कांशीरामजी यांना अनेक कड्यांमध्ये संरक्षण देण्याचे काम युवा कार्यकर्त्यांनी केले होते. त्या दुसऱ्या कडीमध्ये मी स्वतः होतो. फार जोश होता त्यावेळी आमच्यात.
यावेळी मागून कुणी तरी एक नारा दिला… बाबासाहेब का दुजा नाम… कांशीराम… कांशीराम ! कांशीरामजी यांनी लगेच मागे वळून पाहिले. बंद करा हा नारा, अशी त्यांनी तंबी दिली. फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा द्यायला सांगितले. लगेच हा नारा बंद झाला. कांशीरामजी स्तुतीप्रिय नव्हते. ते स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठे समजत नव्हते. मी बाबासाहेबांचा एक सेवक आहे असे ते म्हणायचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप कांही कार्य करुन ठेवले आहे, फक्त त्या विचारांवर प्रामाणिकपणे चालण्याची आम्हाला आवश्यकता आहे असे ते म्हणायचे ! पत्रकारांनी एकदा कांशीरामजी यांना प्रश्न विचारला होता की, साहब, आप बहोत मेहनत कर रहे हैं, अखीर आप का मक्सद क्या है ? कांशीराम जी हजर जवाबी होते, ते लगेच म्हणाले होते…
“मेरा कोई मक्सद नहीं है, आप को मक्सद जाणना है तो बुद्ध रविदास फुले शाहू आंबेडकर के पास जाना होगा ! उन का एक मक्सद था, मैं तो उन का मक्सद पुरा करने के लिये काम कर रहा हू !! हमारे पुरखों के मक्सद के लिये काम करना यह हमारा एक सपना हो सकता है..!
पत्रकारांनी पुन्हा विचारले की, आखीर आप का सपना क्या है ? कुणी सामान्य पुढारी असतील तर बोलले असते की, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री और प्रधानमंत्री बनना हमारा सपना है ! पण मान्यवर कांशीरामजी म्हणाले, “मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत है !”
चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या काळातील भारत साकार करणे हे मान्यवर कांशीरामजी यांचे स्वप्न होते. ज्या सम्राट अशोकाचे स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय समाविष्ट केले. चक्रवर्ती अशोक चक्र हे भारताच्या तिरंगा झेंड्यावर विराजमान केले, त्या सम्राट अशोकाचे राज्य साकार करणे हे मान्यवर कांशीराम जी यांचे स्वप्न होते. गुरु रविदासांचेही तेच स्वप्न होते. बेगमपूर हे त्यांचे राज्य म्हणजे सम्राट अशोकाचे आदर्श राज्य होते. अमेरिकन विदुषी गेल ऑम्वेट यांनी त्यांच्या “सिकिंग बेगमपुरा” या ग्रंथात याचे वर्णन केले आहे.
ह्या सर्व गोष्टी आता सोशल मीडियाच्या या जगात सर्वांना कळू लागल्या आहेत, म्हणून मान्यवर कांशीरामजी यांचा सर्वत्र उदोउदो चालू आहे, यामागे त्यांचा राजकीय उद्देश असला तरीही मान्यवर कांशीरामजी ही आज भारताची मजबूरी झाली आहे म्हणून तर वामन मेश्राम, चंद्रशेखर आझाद, अखिलेश यादव, राहुल गांधी, संजय राऊत, राज ठाकरे हे मान्यवर कांशीरामजी यांचे मुक्त कंठाने कौतुक करीत आहेत. अगदी भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवरही कांशीरामजी यांचा फोटो झळकू लागला आहे. यामुळे बहुजन समाजाने फार हुरळून जाण्याची गरज नाही पण कांशीराम जरुरी झाले आहेत हे वास्तव सत्य लक्षात घेणे जरुरी आहे, म्हणून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आम्ही दिलेला नारा, ” देश की यह मजबुरी है,
कांशीराम जी जरुरी है!” सार्थक होत आहे !
इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड
मो. ७०६६२१०१९४
