भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.
देगलूर प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात आजही दर्जेदार रस्त्यांच्या अभावामुळे परिसर विकासापासून मागे पडलेला आहे. प्राचीन मंदिरांसाठी ओळख असलेल्या या भागात पर्यटनाची मोठी क्षमता असूनही खराब रस्त्यांमुळे पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देगलूर तालुक्यातील रामपूर, होट्टल, येरगी आणि करडखेड येथे चालुक्यकालीन ऐतिहासिक मंदिरे असून ती महत्त्वाची पर्यटनस्थळे मानली जातात. देश-विदेशातून भाविक व पर्यटक येथे येत असतात; मात्र सुसज्ज रस्ते नसल्याने या पर्यटनाला अपेक्षित चालना मिळत नाही.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 हा रामपूर–होट्टल–येरगी–चेंडेगाव (तेलंगणा)–माळेगाव–बिदर मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 शी जोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे नांदेड ते बिदर अंतर कमी होणार असून प्रवास सुलभ होईल. तसेच देगलूर ते हनेगाव हा रस्ता देखील राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदेडहून बिदर येथील गुरुनानक गुरुद्वाराला जाणारे शीख भाविक दररोज या मार्गाचा वापर करतात. सध्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याने प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. हा मार्ग सुधारल्यास भाविकांसह विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच या चार ऐतिहासिक मंदिरांचा समावेश असलेले पर्यटन सर्किट विकसित झाल्यास या भागातील पर्यटन वाढीस मोठी चालना मिळेल आणि ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत होईल.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा येरगीचे सरपंच संतोष पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी येरगी येथील चालुक्यकालीन वारशावर आधारित कॉफी टेबल बुक देऊन गडकरी यांचा सत्कार केला.
