देगलूर प्रतिनिधी,दि.२१ :-काल दि. २० फेब्रुवारी रोजी परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात शिवछत्रपती जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष स्मिता कुलकर्णी, प्रमुख वक्ते भानुदास शेळके मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली.

वक्त्यांच्या मार्गदर्शनाची सुरूवात चि.गणेश निलावार या विद्यार्थ्याने शिवघोषणा देऊन केली. कार्यक्रमाचे वक्ते भानुदास शेळके यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन या ठिकाणी केले. यात जिजाऊंनी शिवरायांना राम, कृष्ण,भीम व अर्जुन यांच्या शौर्य कथा व बालपणी त्यांच्या गुरुंनी त्यांच्यावर केलेले संस्कार सांगितले. अफजलखानाची भेट, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्यातून सुटका ,पुरंदरचा वेढा व “गड आला पण सिंह गेला “यासारख्या अनेक शौर्य कथा सांगितल्या.
स्वराज्याचे तोरण बांधण्यापासून ते स्वराज्य निर्माण करण्यापर्यंत शिवरायांना ज्या ज्या संकटांना तोंड द्यावे लागले व कशा प्रकारे शिवरायांनी सर्व शत्रूंवर मात करून स्वराज्य स्थापन केले याविषयी सरांनी मार्गदर्शन केले. याचबरोबर शिवरायांच्या जीवनातील पाच गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे आहेत असेही सरांनी सांगितले. यात अटलता- दृढ निश्चय, नही हो सकता- क्यों नही हो सकता, बल के साथ बुद्धी का प्रयोग, दुसऱ्यांसाठी जगणे व नवीनता.
यानंतर अध्यक्ष समारोपात कुलकर्णी बाई यांनी शिवरायांच्या गनिमी काव्यांचे वर्णन केले, शिवाजी महाराज रात्रीला वेशांतर करून फिरायला जायचे आणि जनतेच्या मनात राजा विषयी काय मनोभावना असतील हे जाणून घेत असत त्यानुसार प्रजेला आवश्यक असणाऱ्या बाबींचा ते अवलंब करत असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले.यानंतर विद्यार्थ्यांनी किल्ले बनवणे या उपक्रमात सहभाग नोंदवला.यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

