नांदेड,प्रतिनिधी,दि.१४ :- भ्रष्टाचाराची सवय लागलेले कर्मचारी, अधिकारी व प्रशासन कधी काय करतील याचा नेम नाही. याचाच एक नमुना नांदेड शहरातील गीता नगरात पाहायला मिळत असून एका भागाला अगोदरच्या दोन जलवाहिन्याने पाणीपुरवठा होत असताना समांतर त्याच भागात तिसरी जलवाहिनी टाकण्याचा पराक्रम नांदेड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नांदेड मनपा आयुक्तांना निवेदन देऊन सदरील भ्रष्टाचार तात्काळ थांबवावा अशी विनंती केली आहे.

प्रभाग क्रमांक ४ मधील गीता नगर वसाहतीतल्या एका गल्ली मधल्या नागरिकांना पाणीपुरवठा होण्यासाठी ०२ इंची व ०३ इंची जीआय पाईपच्या दोन पाईपलाईन अगोदरच अस्तित्वात आहेत. ते पाईप कुठेही लिकेज अथवा खराब झालेले नाहीत.
या दोन पाईपलाईन वरून या गल्लीतल्या नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होत असतो. त्याबाबत कोणाही नागरिकांची पाणी येत नाही अशी तक्रार नसताना देखील या भागात नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या झोन क्रमांक २ च्या अभियंतांनी ०४ इंची व्यासाचे जीआयचे ५० ते ६० लोखंडी पाईप दिनांक ३ मार्च २०२३ रोजी आणले आणि रस्त्याच्या मधोमध जेसीबी मशीनने खोदकाम करून मिली भगत कंत्राटदाराच्या मनुष्यबळाच्या साह्याने हे पाईप दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक ६ मार्च रोजी बुजऊन टाकले.
याचे गोड बंगाल काय? असा प्रश्न परिसरातील स्थानिक नागरिकांतून व्यक्त केला गेला आहे. ही गंभीर बाब लक्षात आल्यानंतर या भागातले रहिवासी व वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते साप्ताहिक प्रत्यंतरचे संपादक दीपक कसबे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली असता सदरील प्रकार उघडकीस आला आहे.
पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांना याबाबत फोनवरून विचारणा केली असता व त्यांना याबाबतची सर्व हकीगत सांगितल्यानंतर त्यांनी हे काम स्वामी साहेबांनी सांगितले आहे. त्यासाठी आम्ही हे विना निविदा व वीना वर्क ऑर्डरचे काम करीत असल्याचे सांगितले. जल कुंभ घराजवळ असून देखील प्रभाग क्रमांक 04 मध्ये अनेक नगरातील नागरिकांच्या नळांना कमी दाबाने पाणी येत असते. विद्युत मोटारी लावल्याशिवाय नागरिकांच्या नळाला पाणी येत नसते.
त्या वीज बिलाचा भुरदंड परिसरातील मालमत्ता धारकांना पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अभियांत्यामुळे सोसावा लागत असल्याची फिर्याद या भागातील नागरिकांनी केली आहे. त्याला जिम्मेदार कोण असा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता हा नवीन प्रकार समोर आला आहे. वर्षभराचा पाणी कराचा भरणा करून देखील दोन दिवसाआड पाणी सोडले जाते.
हा एक प्रकारचा आर्थिक छळ असून मालमत्ता धारकावर हा अन्याय असल्याचे कसबे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गीतानगरामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत असला तरी या भागातील इतर नगरात पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होतो.
त्यामुळे त्या- त्या भागामध्ये नवीन यंत्रणेचा वापर करण्याऐवजी महानगरपालिकेने एकाच भागात अगोदरच्या दोन जलवाहिन्याचे पाईप असताना त्याच ठिकाणी घाईघाईने कुठल्याही निविदे शिवाय व लेखी आदेशाशिवाय या भागात एका दिवसात तिसरी जलवाहिनी टाकण्याचा खटाटोप का केला यावर नागरिकांतून संशय व्यक्त केल्या जात आहे.
याबाबतची तक्रार दीपक कसबे यांनी आयुक्तांना दिली असून ताबडतोब या गैरप्रकाराचा शोध लागावा व दोषीवर कारवाई करण्यात यावी अन्यथा परिसरातील नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिला आहे.

