नांदेड प्रतिनिधी,दि.२३ :- मान्सून लांबल्यामुळे शेतकऱ्यांसहित सर्व नागरिक चिंतातूर असल्यामुळे माता रत्नेश्वरी ला साकडे घालण्यासाठी अमरनाथ यात्री संघ,भाजप, लायन्स तर्फे रविवार दि.२५ जुन रोजी सकाळी ६ वाजता २१व्या रत्नेश्वरी पाऊस दिंडीचे आयोजन करण्यात आले असून रत्नेश्वरी गडावर अमरनाथ यात्रेकरू हजारो बिया पेरणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
बालाजी मंदिर हनुमानटेकडी येथून सुरू होणार्या या पाऊस दिंडीचे यंदाचे एकविसावे वर्षे आहे.एकविसावी अमरनाथ यात्रा ३० जूनला व बाविसावी अमरनाथ यात्रा १४ जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे. अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने दोन महिन्यापासून पायी चालण्याचा व प्राणायामचा सराव दिलीप ठाकूर हे दरवर्षी घेतात. यात्रेकरूंची तयारी कितपत झाली याची चाचपणी या पाऊस दिंडी मध्ये करण्यात येते.
रस्त्यामध्ये जागोजागी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, पवन गुरुखुदे,कैलास महाराज वैष्णव, गणेश झोळगे, स्वच्छता दुत माधवराव झरीकर यांच्या तर्फे चहा-फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे .दरवर्षी प्रमाणे दानशूर व्यापारी जितेंद्र भयानी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नेश्वरी देवस्थान व अन्नपुर्णा माता देवस्थान तर्फे अमरनाथ यात्रेकरूंचा सत्कार करण्यात येणार आहे.
अमरनाथ यात्रेकरूंची मोफत आरोग्य तपासणी डॉ. महेश तळेगावकर यांच्या वतीने करण्यात येणार आहे.३० जुन रोजी अमरनाथला जाणार्या यात्रेकरूंना टी शर्ट, रेनकोट व टोप्या देण्यात येणार आहेत. पाऊस दिंडी मध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपल्या घरी जमा असलेल्या बिया सोबत घेऊन यावे असे आवाहन अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे.