बिलोली, दि. २८ सप्टेंबर :-पत्रकारिता ही समाजाचा कणा मानली जाते. सत्य व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच सामाजिक जाणीवा जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करीत असतात. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या बिलोली येथील ज्येष्ठ पत्रकार सुनिल निवृत्तीराव कदम यांना यंदाचा “दर्पण पत्रकारिता सन्मान २०२५” जाहीर झाला आहे.
ही घोषणा दैनिक वृत्त महानगर वृतपत्राच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली. यावेळी वृत्त महानगर चे मुख्य संपादक कुलदिप डी. सुर्यवंशी यांनी कदम यांना सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव केला. समाजोपयोगी, शैक्षणिक, धार्मिक तसेच विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल कदम यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
आगामी सन्मान सोहळा
हा प्रतिष्ठेचा सन्मान सोहळा दि. ५ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. जिल्हाभरातील अनेक मान्यवर, पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.
उपस्थित मान्यवरांचा गौरव
या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र कांबळे, वृत्त महानगर चे संपादक कुलदिप सुर्यवंशी, तालुका प्रतिनिधी मार्तंड जेठे यांच्यासह संदीप गायकवाड, शेख फारुखी, माधव ऐडके, सतीश बळवंतकर, शेख रियाज, संजय जाधव, धम्मपाल जाधव, संजय जेठे यांची उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांनी कदम यांचे अभिनंदन करताना, त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाला खरी दर्पणाची उपाधी असल्याचे गौरवोद्गार काढले.
पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण
पत्रकारितेतील आपल्या प्रामाणिक व निडर कार्यशैलीसाठी ओळख असलेले सुनिल कदम हे दर्पण पत्रकारिता सन्मान २०१५ साठी निवडले गेल्याने नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
