अहिल्यानगर प्रतिनिधी, दि. २७ जानेवारी :- प्रजासत्ताक दिनाची पूर्वसंध्या व ‘वंदे मातरम्’ गीताच्या निर्मितीचे १५० वे वर्ष… अशा दुग्धशर्करा योगावर अहिल्यानगरचा ऐतिहासिक किल्ला काल देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. निमित्त होते, भारतीय सैन्याच्या ‘मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट’ने सादर केलेल्या खास बँड पथकाच्या कार्यक्रमाचे !
इतिहासाच्या साक्षीने देशभक्तीचा जागर
ज्या किल्ल्याच्या चार भिंतींनी भारताचा स्वातंत्र्यलढा पाहिला, जिथे पंडित नेहरू, सरदार पटेल व मौलाना आझाद यांच्यासारखे दिग्गज नेते कैद होते, त्याच किल्ल्यात काल स्वातंत्र्याचे सूर घुमले. विशेष म्हणजे, पंडित नेहरूंनी ज्या किल्ल्यात ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ लिहिला, तिथेच हा सोहळा पार पडल्याने वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.
मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या ३२ जवानांनी जेव्हा आपल्या वाद्यांवर देशभक्तीपर धून छेडली, तेव्हा उपस्थित शेकडो नागरिक भारावून गेले. ‘वंदे मातरम्’, ‘मेरा मुल्क मेरा देश’, ‘सॅम बहादूर’ आणि ‘कदम कदम बढाये जा’ या गाण्यांच्या सुरांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. कार्यक्रमाचा शेवट जेव्हा ‘सारे जहाँ से अच्छा’च्या घोषाने झाला, तेव्हा सर्वांच्याच मनात देशाभिमान दाटून आला.
आजच्या तरुण पिढीला आपल्या इतिहासाची जाणीव व्हावी. त्यांच्यात शिस्त व राष्ट्रप्रेम रुजावे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता, असे आयोजकांनी सांगितले.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने, किल्ल्याच्या तटांवर घुमलेले हे सूर २०२६ च्या प्रजासत्ताक दिनाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली एक अनोखी मानवंदना ठरली.
