साहित्य, संस्कृती व सामाजिक जाणीवांचा वारसा जपणाऱ्या संस्थेचा प्रेरणादायी प्रवास.
हैदराबाद प्रतिनिधी दि.०१ :- साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणीवा जपणाऱ्या भाग्यनगर सरस्वती साहित्य सेवा संगमचा २३ वा स्थापना दिन सोहळा आज रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे नूतन अध्यक्ष श्री उदयकुमार नाईक यांनी दिली.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री रविंद्रनाथसिंह चव्हाण यांनी गेल्या २३ वर्षांपासून संस्थेचे कार्य यशस्वीपणे सांभाळत साहित्यिक चळवळ मजबूत केली. नुकतीच त्यांनी संस्थेची जबाबदारी श्री उदयकुमार नाईक यांच्याकडे सुपूर्द केली असून त्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच स्थापना दिन असल्याने कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी सर्व सभासदांची असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा सोहळा Gnosis Vaidya Vidhya Prabodhini, मेट्रो पिलर क्र. १५५५, पोचम्मा टेंपल लेन, चैतन्यपुरी, दिलसुखनगर, हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
ई. सन २००३ मध्ये वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या दोन दशकांहून अधिक काळात साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध काव्यसंमेलने, साहित्यिक मेळावे, स्पर्धा व समाजप्रबोधन उपक्रमांद्वारे नवोदित तसेच प्रगल्भ साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. संस्थेचे ‘भाषा सेतू’ हे त्रैमासिक विशेष लोकप्रिय असून विविध भाषा, जाती-पंथातील साहित्यिकांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री रोहित चेबरोलू (Centre Head Academic Operation, HOD Physics) उपस्थित राहणार असून ‘साप्ताहिक महिमा खादीचा’चे मुख्य संपादक श्री गजानन गंगाधरराव बिडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. संस्थापक-अध्यक्ष श्री रविंद्रनाथसिंह चव्हाण अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष उदयकुमार नाईक व उपाध्यक्ष नंदकुमार बैजवाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जयेशकुमार महेन्द्रा, मिलिंद पाठक, तुम्मा जनार्दन, राघवेंद्रराव देशपांडे, लता संघी आदी सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. स्थापना दिनानिमित्त साहित्यप्रेमी, कवी, लेखक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
