पीएमश्री टॅलेंट सर्च परीक्षेतून विद्यार्थ्यांना नवी दिशा; गुणवंतांचा सत्कार व नवोदय-स्कॉलरशिपसाठी मोफत मार्गदर्शन.

 

तोंडचिर जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उन्हाळी वर्गांचीही सुरुवात.

 

उदगीर प्रतिनिधी :- जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा तसेच मराठी शाळांचे अस्तित्व अधिक बळकट व्हावे, या उद्देशाने पीएमश्री जिल्हा परिषद शाळा तोंडचिरच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘पीएमश्री टॅलेंट सर्च परीक्षा’ उद्या, दि. २४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 

 

या परीक्षेसाठी बेलसकरगा, रावणगाव, तादलापूर, धोंडीहिप्परगा, शेल्हाळ आणि बामणी या गावांतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून केंद्रस्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणाची ओळख करून देत त्यांच्या बौद्धिक क्षमतेला वाव देण्याचा हा प्रयत्न आहे.

 

 

या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक शाळेतून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच पालकांमध्येही शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होणार आहे.

 

 

 

याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवोदय विद्यालय व शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षांच्या अनुषंगाने उन्हाळी पूर्वतयारी वर्गही सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक मार्गदर्शन व क्लासेस आयोजित करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार स्पर्धा परीक्षा तयारीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

 

नवोदय व स्कॉलरशिप परीक्षांसाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक नवी ओळख ठरणार असून, ग्रामपंचायतीच्या वतीनेही या उपक्रमास पाठिंबा देण्यात आला आहे. या संधीचा विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

हा उपक्रम केवळ परीक्षा मर्यादित न राहता, जिल्हा परिषद शाळांबद्दलचा विश्वास वाढवणारा ठरणार आहे. मराठी शाळांचा पट वाढवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जाणीव करून देणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगासाठी सक्षम बनवणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

 

 

या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी मोठ्या उत्साहाने परिश्रम घेतले असून, उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.