तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार

ग्रामपंचायतींचे रुपांतर नगरपरिषद/नगर पंचायतीत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन; १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना होणार लाभ. शासन निर्णय जारी

मुंबई, दि. ०७ – ज्या ग्रामपंचायतींचे नगर परिषद अथवा नगर पंचायतीत रुपांतर झाले आहे, तेथील सफाई कर्मचाऱ्यांना या नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये रिक्त जागांनुसार सामावून घेण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यभरातील १४७७ सफाई कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

नवनिर्मिती नगर परिषदा व नगर पंचायतींच्या आकृतीबंधात सफाई कर्मचाऱ्यांची नियमित पदे मंजूर नसल्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन झालेले नाही.

विविध नवनिर्मित नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये ग्रामपंचायतकालीन सुमारे १४७७ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या शासनाच्या प्रचलित धोरणानुसार समावेशनाची प्रक्रिया पूर्ण होऊन देखील मंजूर व रिक्त असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांवर तत्कालीन ग्रामपंचायतींमधील सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. यानुसार मंजूर व रिक्त जागांवर विहीत शैक्षणिक व तांत्रिक अर्हता प्राप्त असलेल्या इच्छुक सफाई कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, विहीत तांत्रिक अर्हता पूर्ण न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना यासाठी महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिक प्रशिक्षण व संशोधन संस्था (मित्रा) या संस्थेच्या माध्यमातून ६ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांचे समावेशन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *